फुरसुंगी -आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय अधिकारी नियोजनाच्या बैठका घेत असले तरी हडपसर-सासवड पालखी मार्गातील तुकाईदर्शन ते दिवेघाट दरम्यान रुंदीकरणाला मुहूर्त कधी लागणार? या महामार्गाला कोणी वाली उरला की नाही, आणखी किती बळी गेल्यावर सरकारला जाग येणार, असा सवाल स्थानिक नागरिकांकसह वारकऱ्यांकडूनही केला जात आहे.
हडपसर-सासवड महामार्गातील तुकाईदर्शन ते दिवेघाट दरम्यानच्या रस्त्याचे काम रखडले आहेच शिवाय या रस्त्याची साधी डागडुजीही केली जात नसल्याने या पालखी मार्गाची पूर्णत: “वाट’ लागली आहे. पालिकाप्रशासनचे दुर्लक्ष असल्याने अतिक्रमण वाढली आहेत. पालखीमार्ग असुनही संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाऐवजी गल्लीबोळातील रस्ता झाला आहे.
तुकाई दर्शनपासून एसपी इन्फोसिटी, भेकराईनगर चौक, पॉवर हाऊस, उड्डाणपुल, मंतरवाडी चौक, उरुळी देवाची फाटा ते दिवेघाट दरम्यान सतत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात, त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे मोठे धोकादायक काम झाले आहे.
फुरसुंगी उड्डाणपुलावर एखादे वाहन बंद पडले, तर तासन्तास वाहतूक कोंडी सुटत नाही. उड्डाणपूल संपताच पुढे उरुळी देवाची फाट्यादरम्यान अनेक कपड्यांची होलसेल दुकान आहेत. या ठिकाणी ग्राहक आपली वाहेन वाहने रस्त्यावरच आडवी-तिडवी उभी करतात. त्यामुळे येथे अपघातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णाला उपचारासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिका कित्येकदा वाहतूक कोंडी अडकल्या आहेत, त्यानंतरही प्रशासन ढिम्म आहे.