मुंबई – मनोरंजन विश्वात साठ वर्षांहून अधिक काळ आपल्या गायनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका ‘सुलोचना चव्हाण’ यांचं आज निधन झालं आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झाले आहे.
वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या जाण्यामुळे त्यांचे चाहते, मित्र-परिवार, कुटुंब सगळ्यांनाच धक्का बसला असून, त्यांच्या पश्चात धाकटा मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
सुलोचना चव्हाण यांना 1965 साली “मल्हारी मार्तंड” या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. त्याहीपलीकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेल्या गाण्यांनी आणि विशेषतः लावण्यांनी त्यांना जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळाले आहे. मात्र, सुलोचना चव्हाण यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब कसा मिळाला हे तुम्हाला माहित आहे का? तर याबद्दल जाऊन आज घेऊयात….
… अन् सुलोचना चव्हाण यांना मिळाला ‘लावणीसम्राज्ञी’ किताब
आचार्य अत्रे यांचा ‘हीच माझी लक्ष्मी’ हा सुलोचना चव्हाण यांचा पहिला मराठी सिनेमा. या मराठी सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. त्यानंतर 1952 सली शाम चव्हाण यांच्या ‘कलगीतुरा’ या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदा लावणी गायन केलं.
या गाण्याने सुलोचना चव्हाण यांचं आयुष्य बदललं. हंसा वाडकर यांच्यावर चित्रीत झालेली ही लावणी गायल्यानंतर आचार्य अत्रे यांनी सुलोचनाबाईंना ‘लावणीसम्राज्ञी’ असा किताब दिला. आणि त्यानंतर सगळीकडे त्यांना ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण म्हणूनच हाक मारली जात.
सुलोचना चव्हाण यांची काही गाजलेली गाणी….
1. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
2. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
3. पाडाला पिकलाय आंबा
4. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
5. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
6. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
7. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?