मुंबई –करोनामुळे देशभरात क्रीडास्पर्धा ठप्प असल्याने अनेक खेळाडूंना नैराश्याने ग्रासले आहे. त्यामुळे अनेक जण टोकाचा निर्णय घेताना दिसून येत आहेत. अशातच शहरातील एका 25 वर्षांच्या युवा क्रिकेटपटूने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. करण तिवारी असे आत्महत्या केलेल्या क्रिकेटपटूचे नाव आहे.
मुंबईतील स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेला करण रणजी संघाच्या सराव शिबिरातही नेट गोलंदाज म्हणून सहभागी होत होता. गेल्या काही वर्षांपासून तो आयपीएलमधील एखाद्या संघात निवड होण्याची प्रतीक्षा करत होता. मात्र, त्याला सातत्याने अपयश येत होते. त्यातूनच त्याची मानसिक स्थिती खालावली व त्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. या वृत्ताला मुंबई क्रिकेट संघटनेनेही दुजोरा दिला आहे.