माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ः पिंपळे खालसा येथील सभेत टीका
शिक्रापूर: सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीचे धोरण राबवत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील साखर कारखाने तसेच उद्योग अडचणीत आले आहेत, अशी टीका माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली.
पिंपळे खालसा येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारनिमित्त आयोजित सभेत बोलताना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. याप्रसंगी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे,
सुभाष उमाप, उपसभापती सविता पऱ्हाड, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, अमोल जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, पिंपळे खालसाच्या सरपंच अश्विनी धुमाळ, उपसरपंच दीपक शेळके, चेअरमन अर्जुन गावडे, व्यंकटेश कृपा साखर कारखान्याचे चेअरमन संदीप तौर, राजेंद्र धुमाळ, अशोक धुमाळ, दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, सरकार कडून उद्योगपतींना मदत मिळते; मात्र शेतकऱ्यांना ती मिळत नाही. चांगले काम करणाऱ्या लोकांच्या हातात रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना देण्याचे आवाहन केले आहे. तर यावेळी बोलताना विरोधक यापूर्वी कधीही कोणाच्या सुखदुःखात आले नाहीत.
करोना काळात नागरिकांची काळजी देखील घेतली नाही; मात्र आता मते मागण्यासाठी भल्या पहाटे देखील काकड आरतीला हजेरी लावतात अशी टीका शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी विरोधकांवर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच शहाजी धुमाळ यांनी केले. प्रास्ताविक मानसिंग पाचुंदकर यांनी केले आणि माजी सरपंच रमेश धुमाळ यांनी आभार मानले.