सादिक सय्यद
पाचगणी – आपल्या जीवाची पर्वा न करता छातीवर गोळ्या झेलून पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब याला जेरबंद करणारे जावळी तालुक्याचे केडांबे गावचे सुपुत्र हुतात्मा तुकाराम ओंबळे यांचे स्मारक गेल्या 14 वर्षांहून अधिक काळ रखडलं आहे. जावळी- महाबळेश्वरचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाकरीता 60 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.
हुतात्मा तुकाराम ओंबळे स्मारकाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला असून केडांबे या त्यांच्या जन्मगावी अडीच एकर जागा स्मारकाकरीता आरक्षित करण्यात आली आहे. या स्मारकाचा आरखडा देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्गी लावण्यात अधिकाऱ्यांनी प्रयत्नाची पराकष्टा केली आहे. वेण्णा नदीच्या तीरी केडांबे येथे तुकाराम ओंबळे स्मारकाचा आराखडा तयार आहे.
या स्मारकात 18 स्तंभ, ध्यान मंदिर, सुसज्ज वाचनालय, बहुउद्देशीय सभागृह, बगीचा यांच्यासह विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. ओंबळे स्मारकाकरीता निधीची उपलब्धता कमी पडणार नसल्याची ग्वाही तुकाराम ओबळे यांचे बंधू एकनाथ ओबळे यांना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जावळीच्या सुपुत्राचा जाज्वल इतिहास सदैव रुजण्याकरीता केडांबे येथे तुकाराम ओबळे यांचे स्मारक लवकर उभारले जावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेची आहे.
देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देत देशासाठी रक्त सांडणाऱ्या जावळीतील केडांबे गावच्या सुपुत्राचे 14 वर्षांपासून रखडलेले स्मारक लवकर उभारावे. तेव्हाच जावळीच्या या सुपुत्राच्या शौर्याचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना सदैव मार्गदर्शक राहणार आहे.
वैशाली ओंबळे (हुतात्मा तुकाराम ओंबळे यांची कन्या)