मुंबई – राज्यात येत्या 7 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन झाले नाहीं तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असे ज्येष्ठ भाजप नेते व राज्याचे विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्ता वाटपावरून जोरदार संघर्ष सुरू आहे त्यामुळे सरकार स्थापनेची प्रक्रिया खोळंबली आहे.
त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला. एका मराठी वृत्तवावाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केल्याने त्याला महत्व आहे. तर केवळ शिवसेनेवर दबाव आणणण्यासाठीच त्यांनी हे विधान केल्याचाही आक्षेप दुसऱ्या गोटातून घेतला जात आहे.
मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की निकाल लागल्यानंतर लगेचच दिवाळीचा सण सुरू झाल्याने सरकार स्थापनेची चर्चा खोळंबली होती पण ती येत्या एकदोन दिवसांत सुरू होईल. येत्या 7 नोव्हेंबर पर्यंत त्याविषयी निर्णय होणे अपेक्षीत आहे पण जर तसे झाले नाही तर राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येऊ शकते. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये अजून सरकार स्थापनेविषयी कोणतीही चर्चा झाली नाही असेही मुनगंटीवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.