मुंबई : राज्यातील जनतेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांना विरोधी बाकांवर बसण्याचा कौल दिला. त्यानुसार आम्ही विरोधकांचीच भूमिका निभावू, असे राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले.
भाजप आणि शिवसेनेतील सत्तासंघर्षामुळे महायुतीच्या सरकार स्थापनेची प्रक्रिया रखडली आहे. भाजप आणि शिवसेनेतील चर्चाप्रक्रिया ठप्प असूनही त्या पक्षांचे नेते एकमेकांविरोधात आक्रमक स्वरूपाची वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे पुढील सरकार महायुतीचेच असणार का, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यापार्श्वभूमीवर, गुरूवारी रात्री येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी विरोधी बाकांवरच बसणार असल्याच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. भाजप आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक युद्धाबाबत काही बोलण्याचे त्यांनी टाळले. तो त्यांचा विषय आहे. त्यावर मी बोलण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी म्हटले.