चंद्रपूर – माझे तिकीट मीच कापेल, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी वल्गना केली होती. मात्र, आता त्यांची दिल्लीत जाणारी वाट जनता कापेल, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
बिचाऱ्यांना इच्छा नसताना जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात ही वरमाला घातली असल्याचे चित्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. भाजपच्या लोकसभेच्या 20 उमेदवारांची यादी बुधवारी जाहीर झाली.
या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक नसून आपल्याला राज्यातच राहायचे असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले होते. मात्र, तरी देखील त्यांचे नाव घोषीत झाल्यामुळे वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर वार केला आहे.
नव्या संसद भवनाला चंद्रपूर मधून पाठवलेल्या लाकडाचा दरवाजा आहे. या दरवाज्यातून चंद्रपूरची जनता मला नव्या संसद भवन मध्ये पाठवेल, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली होती. यावरून देखील वडेट्टीवावर यांनी वार केला आहे.
ते लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. ते भाजपच्या प्रांगणातले नाही. त्यामुळे त्या दरवाजातून कोणी आत जायचे, याचा निर्णय चंद्रपूरची जनता घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे येथून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेवर निवडून येईल, असेही यावेळी त्यांनी म्हटले.