हिंगोली – आखाडा बाळापूर येथील बिज गुणन केंद्रात कार्यालयात काम करीत बसलेल्या कृषी पर्यवेक्षकाचा शस्त्राने भोसकून खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली आहे. घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलिसांसह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहे. राजेश शिवाजी कोल्हाळ (रा. कोंडवाडा, ता. सेनगाव) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर शहरालगत बिज गुणन केंद्र आहे. या ठिकाणी राजेश कोल्हाळ हे पर्यवेक्षक म्हणून काम करतात. आज सकाळी कोल्हाळ हे नेहमी प्रमाणे कामकाजासाठी आले होते. गुणन केंद्राच्या परिसरात असलेल्या कृषी विभागाच्या शेतातच मशागतीचे काम सुरु होते तर काही मजूर देखील कामावर होते.
दरम्यान, दुपारी कोल्हाळ हे कार्यालयात काम करीत बसले होते. त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कर्मचारी त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर कोल्हाळ हे रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयास देण्यात आली.
त्यानुसार पोलिस उपाधिक्षक संदीपान शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार राजीव जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र वाघ यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. मयत कोल्हाळ हे सन 2014 पूर्वी कृषीपर्यवेक्षक म्हणून विदर्भात रूजू झाले होते. एक वर्षापुर्वीच त्यांची लातुर विभागात बदली होऊन त्यांना हिंगोली जिल्हा देण्यात आला होता.