हिंजवडी,- पुणे जिल्ह्यातील वाढते नागरीकरण लक्षात येऊन हिंजवडी येथील सबस्टेशनचे काम लवकरच करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.पुणे जिल्ह्यातील हिंजवडी येथे महापारेषण कंपनीने बांधलेले 400 केव्हीचे सबस्टेशन बंद असल्याबाबतचा प्रश्न सदस्य राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे उपकेंद्र बंद नाही. 400 के. व्ही. सह आणखी सहा अतिउच्चदाब उपकेंद्र बॅंक चार्ज करण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश उपकेंद्र त्यांच्या संलग्न वाहिन्या वनविभागाच्या मंजुरी अभावी कार्यान्वित होऊ शकल्या नाहीत. तसेच 66 के.व्ही. पेक्षा अधिक क्षमतेच्या अतिउच्चदाब पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या मनोऱ्याच्या व्याप्त जागेचा तसेच अतिउच्च दाब पारेषण वाहिन्याच्या पट्ट्याखालील जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी मोबदला देण्यासंदर्भात धोरण निश्चित केले आहे. या सुधारित धोरणानुसार बाधित शेतकरी, जमीनधारकांना वाढीव मोबदला देण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.