सातारा, (प्रतिनिधी)- आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ५० हजारांचे अनुदान दिले जाते. या योजनेअंतर्गत मार्चअखेर ५३५ प्रस्तावांपैकी २०० प्रस्तावांच्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. या योजनेतील उर्वरित लाभार्थ्यांसाठी ४८ लाखांचा निधी मंजूर झाला असून येत्या जून महिन्यापर्यंत ९६ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींपैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शीख या धर्मातील असल्यास आंतरजातीय विवाह म्हणून अनुदानास पात्र ठरविण्यात येते. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही एक फेब्रुवारी २०१० पासून आंतरजातीय विवाहांसाठीचे अर्थसहाय्य वाढवून ५० हजार करण्यात आले आहे.
या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा अनुक्रमे ५० टक्के आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारा निधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात येतो. याबाबत प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन पात्र लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. या योजनेंतर्गत प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याचे काम सुरु असून सद्यस्थितीत ३३५ प्रस्ताव प्रलंबित आहेत.
येत्या जून महिन्यात मंजूर निधी मिळाल्यानंतर त्यामधील ९६ लाभार्थ्यांना निधी दिला जाणार आहे. या योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची पडताळणी करुन शासन नियमानुसार संबंधितांना अनुदान देण्यात येत असल्याची माहिती समाजकल्याण विभागातून देण्यात आली.
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. उपलब्ध निधीतून विविध योजना, विकासकामे मार्गी लागत आहेत. आंतरजातीय विवाह करणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यात आले आहे. उर्वरित प्रस्तावांची पडताळणी करण्यात येत असून आणखी अनुदानाची मागणी करण्यात येत आहे. – डॉ. सपना घोळवे ( जिल्हा समाज कल्याण अधिकारी)