हडपसर – महापालिकेत जी 11 गावे समाविष्ट करण्यात आली, ती गावे आणि हवेलीतील उर्वरित भाग एकत्र करून नवीन महापालिका स्थापन केली तर तो निर्णय सगळ्यांच्या हिताचा ठरणार आहे. राज्य सरकारने अर्धवट निर्णय घेण्यापेक्षा हडपसरसह समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केली आहे.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी यापूर्वीही वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट करताना हडपसर ही स्वतंत्र महापालिका असावी अशीच मागणी कायम ठेवली आहे. आता, यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शिवरकर यांनी म्हटले आहे की, फुरसुंगी, देवाची उरूळी, उरूळी कांचन, वडकी, वाघोली, केसनंद, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, लोणीकंद, कात्रजच्या सर्व वाड्या व उंड्री, पिसोळी, वडाची वाडी, औताड वाडी, हांडेवाडी आदी सर्व भाग एकत्र करुन त्याची स्वतंत्र महापालिका स्थापन केल्यास या सर्व भागाचा सुनियोजित विकास होऊ शकेल. हा सगळा भाग मोठ्या लोकवस्तीने गजबजला आहे. तेथे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची गरज आहे. या भागासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी विकासाला हातभार लावावा, असेही शिवरकर यांनी या पत्रात म्हटले आहे.
महापालिकेत समाविष्ट 11 गावांचाच विकास अजून झालेला नाही त्यात आणखी 23 गावांची भर पडली, त्यामुळे केवळ मिळकत करात वाढ झाली आहे. पालिकेत समाविशानंतर सर्वच कामांवर मर्यादा आल्या आहेत. शेवाळेवाडी ही ग्रामपंचायतच हवी.
– अक्षय मेमाणे
उरुळी व फुरसुंगीसाठी नगरपालिका करण्याचा निर्णय सर्वस्वी राजकिय असून तो लोकभावनेच्या पूर्णत: विरोधी आहे. या दोन्ही गावांचा समावेश अगोदरच महापालेकेत झालेला असताना आता नागपालिका करणे म्हणजे विकासाची गंगा उलटी वाहायला लावण्याचा प्रकार होय. यात राजकिय सोय जास्त व लोकांची सोय फार कमी अशी स्थिती आहे. तीन लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास स्वतंत्र महापालिका करावी लागते. पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिका असावी अशी पूर्वीपासून मागणी आहे. – डॉ. सीताराम शरणांगत