फुरसुंगी (महादेव जाधव) -पुणे महापालिकेत 2017 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या फुरसुंगी व उरुळी देवाची या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याने याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही नागरीकांनी या निर्णयाचे स्वागत तर काहींनी केवळ राजकीय मतं तसेच उद्योजकांचा टॅक्स वाचविण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. तर, काही नागरिकांनी अन्य 32 गावेही पालिकेतून वगळून स्वतंत्र पालिका करण्याचा पर्याय सूचविला आहे. या निर्णयाचे दुरगामी परीणाम या दोन्ही गावांच्या प्रगतीवर होऊ शकतात, असेही मत अनेकांनी नोदविले आहे.
राज्य शासनाने स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयाचे वरवर पाहता बहुतांश लोकांनी स्वागत केले असले तरी याचा खरा फायदा उद्योजक तसेच गोदाम मालकांना होणार आहे. नगरपालिकेमुळे परीसराच्या विकासावर मर्यादा येऊन विकास खुंटू शकतो. हडपसर महापालिका निर्माण झाल्यास समतोल व नियोजित विकास होईल, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्य शासनाने फुरसुंगी व उरुळी देवाची गावांची एकत्रित नगरपालिका करण्याच्या निर्णयाने नागरीकांचे कल्याण होणार असेल तर या भागाचा लोकप्रतिनीधी म्हणून या निर्णायाचे मी स्वागत करतो. नगरपालिकेमुळे लोकहिताची कामे व जनतेच्या समस्या सुटणार असतील तर आपण सदैव जनतेच्या मताशी ठाम आहे.
– गणेश ढोरे, माजी नगरसेवक
महाराष्ट्र शासनाने जनतेच्या समस्यांची तत्काळ दखल घेत पुणे महापालिकेच्या वाढीव करातून फुरसुंगी व उरुळी देवाची गावांची स्वतंत्र नगरपालिका करुन सुटका केली आहे. पालिकेत गेल्यापासून आमच्या गावांचा कोणताही विकास झाला नाही, या भागात पाणीटंचाई, कचऱ्याची समस्या,रस्त्यांची दुरवस्था, भरमसाठ करवाढ यातून नागरिक हैराण झाले होते. शासनाने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे.
– संदीप हरपळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा
स्वतंत्र नगरपालिका करण्याच्या निर्णयामुळे या गावांच्या विकासावर मर्यादा येणार आहेत, तरी शासनाने नगरपालिका करण्याऐवजी पुणे महापालिकेचे विभाजन करून अन्य गावांचाही समावेश करीत नवीन हडपसर महापालिका निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास होईल. नगरपरिषदेच्या निधीतून या गावांचा विकास शक्य नाही.
– राजाभाऊ होले, सामाजिक कार्यकर्ते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य असून यामुळे पुणे महापालिकेच्या वाढीव करातून नागरिकांची कायमची सुटका होणार आहे व आमच्या गावच्या विकासाचे धोरण आता आम्हालाच ठरविता येणार आहे, त्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेच्या माध्यमातून एक आदर्श विकासाचे मॉडेल पुढे येईल.
– दीपक काका हरपळे, माजी उपसरपंच
पुणे महापालिकेचा वाढीव कर कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेतला गेला असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुणे पालिकाप्रशासनाला आदेश देऊन वाढीव कर कमी करता आला असता. नवी नगरपालिका करताना या भागाच्या समतोल व सर्वांगीण विकासासाठी शासनाने धोरणात्मक अंमलबजावणी करुन परीसराच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट सादर केली पाहिजे. भविष्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा वेगळे निर्णय होऊ शकतो.
– उल्हास शेवाळे, माजी सरपंच
आजपर्यंत आपण सदैव जनतेच्या हिताचाच विचार केला आहे. या भागातील जनतेची कचरा डेपोच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी रस्त्यावर उतरुन शेकडो आंदोलने, मोर्चे, न्यायालयीन लढाई केली आहे, त्यामुळे एकत्रित नगरपालिकेच्या माध्यमातून गावाचे कल्याण होणार असेल तर आपण गावाबरोबर असून या निर्णयाचे स्वागतच करतो.
– भगवान भाडळे, अध्यक्ष, कचरा डेपो संघर्ष समिती