कात्रज (धिरेंद्र गायकवाड) -महापालिकेत समावेशानंतरही मांगडेवाडी पूर्णत: दुर्लक्ष राहिली आहे. पालिकेत समावेश होत असतानाच मतमतांतरे होत होती. एकीकडे गाव समाविष्ट करून घ्या म्हणणारा गट तर दुसरीकडे गाव महापालिकेमध्ये न घेता गावठाण म्हणून दर्जा द्या, अशी मागणी करणारा गटही होता. तर, गावात किमान मूलभूत सुविधा तरी द्या, अशी माफक अपेक्षा आता नागरिक ठेवत होते. याच वेळी फुरसुंगी आणि उरूळीदेवाची गावासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आमच्याही गावाची ग्रामपंचायतच बरी होती, असा सूर आता पुन्हा उमटू लागला आहे.
पुणे-बंगळूर महामार्गालगत सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या मांगडेवाडी ग्रामपंचायतीची स्थापना 2002 मध्ये झाली. सदस्य संख्या 12 तर सरपंच, उपसरपंच पदी महिला विराजमान झाल्या होत्या. पुणे महापालिकेच्या एकूण 34 गावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये 2017 पासून 11 गावे समाविष्ट केली गेली, त्यानंतर या वर्षी 23 गावे मार्चपर्यंत समाविष्ट करण्यात आली त्यावेळी मांगडेवाडीचाही समोवश करण्यात आला. परंतु, पालिका समावेशानंतर गावातील मूलभूत प्रश्न सुटले नाहीत. इतर समाविष्ट गावातील प्रश्न अद्याप रेंगाळलेले असताना मांगडेवाडी सारखे गाव पालिकेत का आणि कशासाठी समाविष्ट करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही नागरिकांना मिळालेले नाही. पालिकेत गाव गेल्याने विकास होईल, अशी अपेक्षा बाळगारा गटही आता पालिका नकोच असे मत व्यक्त करू लागला आहे.
मांगडेवाडीत या समस्या कायम…
कात्रज परिसरालगत असलेल्या मांगडेवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही पाण्याची समस्या सुटत नसल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत. त्यातही कचरा प्रश्नाची भर पडली आहे. मांगडेवाडीला अद्यापही स्वतंत्र तसेच नवी पाणी योजना नाही. जुन्या विहिरीतूनच पिण्याचे पाणी पुरविले जाते. ही विहीर कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावा शेजारी आहे. सुरवातीच्या काळात या विहिरीच्या पाण्यातून वाडीची गरज भागत होती. परंतु, या परिसराची सध्याची लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. गावांमध्ये बारा महिने पाण्याचे टॅंकर धावत असतात. सुमारे 213.61 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेली मांगडेवाडी डोंगर उतारावर असल्याने ओढ्यालगत इमारतींची संख्या अधिक आहे.
मांगडेवाडीचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर मूलभूत समस्या सुटतील अशी अपेक्षा होती; परंतु आजपर्यंत एकही समस्या सुटलेली नाही. याउलट गावाकडे दुर्लक्षच झाले आहे. कोणत्याही गोष्टीला निधी मिळालेला नाही. त्यामुळे समस्या वाढतच चालल्या आहेत. यामुळे आमची ग्रामपंचायत बरी होती, असे म्हणावे लागेल.
– अर्चना मांगडे, माजी सरपंच