मंचर – राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर आज शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते, पण आता पदोन्नतीच्या संधीत वाढ करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.त्याचा थेट फायदा हजारो पोलीस शिपाई, हवालदार आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक यांना मिळणार आहे.
या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल.
या शिवाय पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलीस शिपाई, पोलीस हवालदार व सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. या निर्णयामुळे पोलीस दलातील पोलीस हवालदार व सहायक पोलीस उप निरीक्षक या संवर्गातील पदांच्या वाढीमुळे एकूण तपासी अधिकाऱ्यांच्या संख्येत भरीव वाढ होणार असल्याने पोलीस अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल.
आता प्रतीक्षा संपली
सध्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना पोलीस नाईक-पोलीस हवालदार-सहायक पोलीस उपनिरीक्षक या तीन पदोन्नतीच्या संधी मिळतात. तसेच तुलनेने पदोन्नतीची पदे कमी असल्याने अपेक्षेपेक्षा पदोन्नतीस जास्त कालावधी लागत असल्याने कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होऊन कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो.
सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर 3 वर्षे सेवा पूर्ण होण्याआधीच काही जण सेवानिवृत्त होतात किंवा काही अंमलदार हे पोलीस हवालदार पदावरूनच सेवानिवृत्त होतात. अशा अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नतीची संधी मिळत नाही. मात्र, या निर्णयामुळे पोलीस दलातील अंमलदारांना पदोन्नतीचा मोठा लाभ होणार आहे.