दोन वर्षांपासून अनुदान रडतखडत : स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळणे झाले बंद
नगर – स्वातंत्र्यपूर्वी काळातील नगर जिल्ह्यामधील पहिले मुलामुलींचे निरीक्षण गृह व बालगृहा गेल्या काही वर्षांपासून घरघर लागली आहे. शासनाकडून देण्यात येणारे अनुदान वेळेत व पुरेसे मिळत नसल्याने सध्या या निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थी- विद्यार्थिंनी दानशुरांकडून मिळणाऱ्या अन्नदानावरच जगत आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य देखील आता बंद झाल्याने संस्थेच्या विश्वस्तांसह अधिकारी कर्मचाऱ्यांना अन्नदात्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. निरीक्षण गृहात दाखल झालेले अल्पवयीन विधी संघर्षात्मक बालकांना याचा परिस्थितीचा फटका बसला आहे.
डिस्ट्रिक्ट प्रोबेशन ऍण्ड आफ्टर केअर असोसिएशन, संचालिक मुलामुलींचे निरीक्षण व बालगृहाची स्थापन 1942 मध्ये बाबासाहेब मिरिकर व दिगंबर चौधरी यांनी केली आहे. आज या निरीक्षण व बालगृहाची आर्थिक स्थिती केवळ शासकीय अनुदान वेळेत व पुरेश्याप्रमाणात उपलब्ध होत नसल्याने नाजूक झाली आहे. या निरीक्षण व बालगृहात 150 ते 200 मुले व मुली राहतात.
याबाबत येथील शिशुगृह व निराधार बालक देखील आहे. अशावेळी या संस्थेला या मुलांच्या अन्न, वस्त्र, निवारा यासह दैनंदिन वस्तू देखील या मुला व मुलींना उपलब्ध करू द्याव्या लागतात. सन 2014-15 पर्यंत प्रति विद्यार्थी 950 रुपये प्रमाणे अनुदान येत होते. परंतु त्या त्यानंतर वाढ करण्यात आली. केंद्र शासनाकडून देखील अनुदान उपलब्ध झाल्याने प्रती विद्यार्थी 2 हजार रुपये अनुदान करण्यात आले. मात्र हे अनुदान एक वर्ष आहे तर दुसऱ्या वर्षी अतियश कमी प्रमाणात आले. नियमित अनुदान येईल, अशी शक्यता कमी झाली आहे. त्याबरोबर या मिळणाऱ्या अनुदानातून स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करता येत होते.
पण आता देखील धान्य देणे शासनाने बंद केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गहू व तांदूळ देण्याचे बंद केले आहे. या संस्थेला दरवर्षी सुमारे गहू व तांदूळ प्रत्येक एक क्विंटलप्रमाणे देण्यात येत आहे. पण आज तेही बंद झाल्याने बाजारातून धान्य खरेदी करणे परवडत नाही. गेल्या दोन वर्षांपासून अनुदान वेळेत मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांना दररोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.
अर्थात नगर शहरातील सर्वात जुने निरीक्षण व बालगृह असल्याने याला अनेक देणग्या तसेच अन्नदान करणारे दाते यापूर्वीपासून मिळत आहेत. पण आता अनुदान रखडत असल्याने या दात्यांच्या संख्येत वाढ करण्याची वेळ या संस्थेवर आली आहे. काही वेळात संस्थेचे विश्वस्त व येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या पगाराची काही रकम देवून या विद्यार्थ्यांसाठी किराणा आणला आहे. तसेच संस्थेच्या ठेवपावत्या देखील मोडण्यात आल्या आहेत. पण आता असे किती दिवस चालणार असा प्रश्न आहे.
अवघ्या 14 कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज
या संस्थेचा कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध 30 जणांचा असतांना सध्या केवळ 14 कर्मचारी आहेत. त्यात स्वयंपाकी, मदतनीस, शिक्षक, अधीक्षक आदी कामांची भूमिका या 14 जणांनाच पार पाडावी लागत आहे. कर्मचारी भरले जात नसल्याने आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. संस्था भरण्यास तयार आहे. पण शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळत नाही.