नागठाणे – निसर्गाच्या आणि उत्तम ग्रंथांच्या सहवासात माणसाच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. कार्यक्षमता वाढते. ग्रंथांमुळे माणसाला ऊर्जा व आनंद मिळतो. निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखे असते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
भरतगाव (ता. सातारा) येथील सुनील शेडगे यांच्या “साताऱ्याच्या सहवासात’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, प्रा. श्रीधर साळुंखे, पत्रकार राजेश सोळसकर, हरिष पाटणे, बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. पाटणे यांनी म्हणाले, सुनील शेडगे यांचे पुस्तक म्हणजे चैतन्याचे अक्षरलेणे आहे. हे पुस्तक माणसाच्या मनात निसर्गाविषयी ममत्व निर्माण करेल. हे पुस्तक पर्यटकांसाठी उपयुक्त आहे, डॉ. माने म्हणाले, या पुस्तकाच्या रुपाने जिल्ह्यातील निसर्ग, इतिहास जिवंत करण्याचे काम झाले आहे. राजेश सोळसकर व हरिष पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील शेडगे यांनी आपल्या लेखनाचा प्रवास उलगडला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण शेडगे, पुस्तक निर्मिती करणारे नीलेश रांजणे व जयराज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. अजिंक्यतारा साखर कारखान्याचे संचालक अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. अजित साळुंखे यांनी आभार मानले.