विकासासाठी अजित पवारांना पाठिंबा : अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे
बारामती – भाजपच्या साथीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बारामतीकरांना आश्चर्याचा धक्का बसला होता; मात्र या धक्क्यातून बारामतीकर सावरताना दिसत आहेत. अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेची पाठराखण बारामतीकर करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते ऍड. केशवराव जगताप, माळेगाव कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे, अनिल तावरे आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे; मात्र याचा अर्थ आमचा शरद पवार विरोध आहे असा मुळीच होत नाही. शरद पवार, अजित पवार हे विकासाचा गाडा पुढे नेणारे नेते आहेत. त्यांच्यातील कौटुंबीक कलह कोणालाही मान्य होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीतून बंड करून अजित पवार भाजपच्या गोटात सहभागी झाले, त्यामुळे बारामतीसह राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. तरी राज्यातील जनतेला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला दुष्काळी परिस्थितीमुळे त्यानंतर अतिवृष्टीमुळे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बेहाल झाला आहे. त्यातच राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्याला स्थिर सरकार मिळत नाही. असतानाच अजित पवार यांनी धाडसी निर्णय घेत भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या साथीने राज्याला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे प्रश्न जलद गतीने सुटण्यास मदत होणार आहे.
केंद्रात भाजपची एक हाती सत्ता आहे. राज्यातही त्यांच्या विचाराचे सरकार असल्यास केंद्राचा निधी मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता अजित पवार त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, त्यामुळेच त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे ऍड. जगताप यांनी यावेळी सांगितले.
उघडपणे बोलण्यास अनेकांचा नकार
अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच बारामतीतल्या तमाम जनतेने देखील त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक केले आहे. उघडपणे बोलण्यास अनेकांचा नकार असला तरी अजित पवारांना त्यांचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे “बारामतीत एकच वादा अजित दादा’ अशी प्रचिती येऊ लागली आहे, असे केशवराव जगताप यांनी स्पष्ट केले.