कामशेत, {चेतन वाघमारे} – दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळांची सध्याची वेळ बदलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांमधून होत आहे.
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच अशी वेळ आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने ही वेळ बदलून ती सकाळची करावी, अशी मागणी विद्याथीं व पालकांमधून होत आहे. सध्या अनेक गावांना पाण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहे.
अनेक गावांतून टँकरचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. सध्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्यातील बहुतेक शाळा या पत्र्याच्या आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने पत्र्याच्या वर्ग खोल्यांतबसून घडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. अनेक वर्ग खोल्यांत पंखे बसवले असले, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ही स्थानिक ग्रामपंचायतीकडे असते. अनेक ग्रामपंचायतींनी वीजबिल न भरल्याने अनेक शाळांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
विद्याथ्यांना पिण्यासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तीन ते चार किलोमीटरची पायपीट करतात किंवा सायकलचा वापर करतात. आता त्यांना उन्हाचा त्रासही सहन करावा लागत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात शिक्षण विभागाने एक मार्चपासून सकाळी शाळा सुरू केली आहे. तर अनेक खासगी शैक्षणिक संस्थांनीही शाळांचे वेळापत्रक बदलले आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही जिल्ह्यातील शाळांचे वेळापत्रक बदलावे, अशी मागणी आहे.
सकाळच्या शाळेचीही काहींना अडचण
सकाळी सात वाजता शाळा सुरू होतात. दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शाळा सुटते. अशावेळी भर दुपारी उन्हातून घरी चालत किंवा सायकलवर जाणे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरते. यामुळे देखील विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो, असे काही पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न शिक्षण विभागाला पडला आहे.
शाळांमध्ये सकाळी दहाला जाणाऱ्या विद्यार्थी व प्राथमिक शिक्षकांना उन्हाचा दाह सोसावा लागतो, तो वेगळाच. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने सध्या उन्हाची तीव्रता वाढीस लागल्याने पाण्याची टंचाई जाणवत असून, काही शाळेचा वीजपुरवठा खंडित असल्याने विद्यार्थ्यांना उष्माघाताचा फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला असल्याने शाळेचे वेळापत्रक बदलायला हवे. – एक पालक