पुणे : राज्यात पवित्र पोर्टलद्वारेच्या शिक्षक भरतीसाठी सव्वा वर्षापासून प्रक्रिया सुरु आहे. शिक्षक भरतीसाठी पूर्वीच सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शाळांमधील शिक्षक भरतीचा टप्पा पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षक भरती साठी शासनाकडून विशेष परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण विभागाने धडपड सुरु केली आहे. यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या मार्फत राज्य शासनाकडे दोन दिवसात प्रस्तावही पाठविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने वर्षापूर्वी घेतला होता. नवीन व जून्या शासनाने विविध विभागाच्या मेगा भरतीच्या अनेकदा घोषणा ही केल्या. मात्र त्याची पूर्तता होऊ शकली नाही. हे उमेदवारांबाबत अन्यायकारकच आहे. शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी पवित्र पोर्टलही कार्यान्वित करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेत सुरुवातीपासून कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचे अडथळे येतच आहे.
आता गेल्या महिन्यापासून करोना विषाणूचा वाढलेला प्रादुर्भाव व त्यामुळे जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन हा शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी मार्च अखेर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. मात्र ते अडथळ्यामुळे कोलमडले आहे.
राज्यात 12 हजार 140 शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. निवड यादीतील सुमारे 6 हजार उमेदवारांना शाळांमध्ये नोकरी मिळाली आहे. माजी सैनिकांच्या 1 हजार 200 जागांसाठी आरक्षणनिहाय उमेदवार मिळाले नाहीत. खासगी शाळांमध्ये मुलाखती घेऊन उमेदवारांची शिक्षक भरती करण्यात येणार आहे. यात 850 शैक्षणिक संस्थांमधील 3 हजार जागा भरण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य शासनाच्या वित्त विभागाने करोनामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली असल्याचे नमूद करत काटकसरीच्या दृष्टीने काही निर्णय जाहीर केले आहेत. यात सार्वजनिक आरोग्य , वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग वगळता इतर कोणत्याही विभागात नवीन पदभरती करू नये असे स्पष्ट केले आहे. यामुळे नोकरभरतीला बंदी घालण्यात आल्याचे जाहीर होताच बेरोजगार उमेदवाराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. या नोकरभरती वरील बंदीमुळे सुमारे ४ हजार ५०० जागांची शिक्षक भरती अडकून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी उमेदवारांकडून होऊ लागली आहे.
पवित्र पोर्टलद्वारेची उर्वरित शिक्षक भरती शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. ‘आरटीई’ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्या नुसार शाळांमध्ये शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीतील जुनीच सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे या भरती प्रक्रियेस परवानगी मिळण्याची गरज आहे. यासाठी शासन स्तरावर प्रस्तावातून सविस्तरपणे बाजू मांडण्यात येणार आहे. शासनाने शिक्षक भरतीसाठी सकारात्मकता दर्शविणे अपेक्षित आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.