नवी दिल्ली – केंद्र सरकारने नुकतेच संसदेत मंजूर केलेले 3 कृषी कायदे छोट्या शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर छोट्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा दावा संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
भारतामध्ये एकूण शेतकऱ्यांपैकी 85 टक्के शेतकरी हे छोटे आहेत. जुन्या पद्धतीच्या बाजार समितीच्या कारभारामुळे या शेतकऱ्यांचे हित साधले जात नव्हते. आता आता तीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजार व्यवस्थेचे फायदे होणार आहेत. 2011 पासून अनेक वर्षाच्या सर्वेक्षणामध्ये या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती.
त्याचा संदर्भ घेऊनच या सुधारणा करण्यात आल्या आहेत. एम एस स्वामीनाथन आणि मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील समित्यांनीही या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना केवळ बाजार समित्याकडे आपले उत्पादन विकण्याऐवजी ग्राहक व खासगी व्यापाऱ्यांना आपले उत्पादन जास्त भावावर विकण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.