शिरूर/केंदूर: (प्रतिनिधी): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिंनी राजीनामा दिल्याने आता या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर वरिष्ठांकडे “फिल्डिंग’ही लावली जात आहे. अखेर सभापती माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे सोमवारी (दि. 29) स्पष्ट होणार असल्याने अनेकांनी पाण्यात देव ठेवले असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. दरम्यान, सभापतीपदासाठी आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर, ऍड. वसंतराव कोरेकर या तिघांची नावे आघाडीवर आहेत.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असून, सभापती शशिकांत दसगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त झाले होते. त्यामुळे या पदासाठी निवडणूक लावण्यात आली आहे. सोमवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता बाजार समितीच्या विशेष सभेत ही निवड होणार असल्याची माहिती शिरूर तालुका सहायक निबंधक हर्षित तावरे व बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांनी दिली.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या काही संचालक फुटून सत्ता विरोधी गटाकडे गेले होते. राष्ट्रवादीच्या संचालकांनी टाकळी हाजी येथील कुंडात आंघोळ करून शपथ घेऊन देवालाही खोटे पाडले होते. हा इतिहास शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीकडे आहे. बाजार समितीत एकूण 19 संचालक आहेत. पणन प्रक्रियामधून निवडून आलेल्या संचालकास मतदानाचा हक्क नाही, त्यामुळे 18 संचालकांना मतदान करता येणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे व त्यांना पाठिंबा देणारे 1 असे मिळून 15 संचालक आहेत, तर भाजपकडे 3 संचालक आहेत.
कोणाची सरशी होणार…
आंबेगाव विधासभा मतदारसंघात शिरूर तालुक्यातील 39 गावे येतात. त्यामुळे शिरूर तालुक्यात आंबेगाव-शिरूर असे दोन राजकीय गट पडलेले आहेत. आंबेगावचे लोकप्रतिनिधी तथा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील तर शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे दोघेही दिग्गज आहेत. त्यामुळे आता सभापतीपदावर या दोन्ही गटांत रस्सीखेच होणार असल्याने आता यात कोणाची सरशी होणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
उपसभापतिपदासाठी राजकीय खेळी?
शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व उपसभापती विश्वास ढमढेरे या दोघांनीही सोमवारी (दि. 15) आपल्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र, आता केवळ सभापतिपदाची निवडणूक लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान 2011मध्ये जसा दगाफटका झाला होता, तसा होऊ नये म्हणून उपसभापतींचा राजीनामा सहायक निबंधकांकडे न देता हातचा राखून ठेवत एका गटानेही राजकीय खेळी खेळून पद आपल्याच ताब्यात कसे राहिल, यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
आमदार अशोक पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
बाजार समिती निवडणुकीत मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीत केवळ उमेदवार दिले होत; परंतु शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी या निवडणुकीत संचालक मंडळ निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावली होती. उमेदवार निवडपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आमदार पवार यांनी मोठे कष्ट करीत तत्कालीन भाजपचे आमदार बाबूराव पाचर्णे व बाजार समितीवर त्यावेळी सभापती असलेले मंगलदास बांदल यांनीही ताकद उभी करण्याचे प्रयत्न केले होते; परंतु यात त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे पुन्हा विरोधक वरचढ होऊ नये यासाठी आमदार पवार काय खेळी खेळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
2011ची पुनरावृत्ती होणार?
बाजार समितीच्या 2011मध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली असल्याचे बोलले जात आहे. अशीच उलाढाल या निवडणुकीत होऊ शकते. कारण त्यात एका पैसेवाल्या संचालकांनी ठरवले तर 2011 ची पुनरावृत्ती होऊ शकते, त्यामुळे या निवडणुकीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.