दास : गरज पडल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून आणखी उपाययोजना
जोखीमीमुळे कर्जच “न’ दिल्यास बॅंकांचा आत्मघात ठरेल
मुंबई –अगोदरच अनुत्पादक मालमत्ता वाढली असताना कर्जाचा हप्ता न देण्याच्या सवलतीमुळे बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्ता आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने भारतातील बॅंकिंग व्यवस्था मजबूत आणि स्थिर असल्याचा दावा केला आहे.
बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वेबिनारमध्ये सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत बॅंकांनी सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे. मात्र, सावध राहणे म्हणजे व्यवहारच न करणे नव्हे. असे केले तर तो आत्मघात ठरेल. बॅंकांनी कर्जच दिले नाही तर बॅंकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल, असे त्यांनी कर्जवितरण कमी झाल्याच्या बाबीकडे लक्ष वेधून सांगितले. कर्जाचा हप्ता काही काळ न देण्याची योजना थोडीफार उपयोगी आहे. मात्र, हे समस्येवरील उत्तर नाही. कर्जाची फेररचना केल्यानंतर बॅंकेची परिस्थिती सुधारेल, असे ते म्हणाले.
रिझर्व्ह बॅंकेचे आणि अर्थमंत्रालयाचे बॅंकिंग क्षेत्रातील परिस्थितीकडे बारीक लक्ष आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये एकूण अर्थव्यवस्थेचा विचार करूनच काही उपाययोजना केल्या आहेत. यामुळे बॅंकिंग क्षेत्राच्या स्थिरतेवर कसलाही परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडील सर्व पर्याय संपलेले नाहीत. गरज पडल्यास परिस्थितीचा विचार करून बॅंक आगामी काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे.