Jayant Patil : केंद्र सरकारने गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. परंतु हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहील.
कांदा निर्यातीवरील बंदी उठवली गेली नसून ती कायम आहे. देशांतर्गत ग्राहकांना वाजवी दरात कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कांदा निर्यातबंदीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा” असं म्हणत निशाणा साधला आहे. याबाबत ट्विट करत जयंत पाटील यांनी लिहिले की, “कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही.”
कांदा निर्यातबंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की, कांदा निर्यातबंदी उठवलीच गेली नाही. राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे.…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 21, 2024
पुढे त्यांनी लिहिले की, “राज्यात चालू रब्बी हंगामात चार लाख ३२ हजार ७९८ हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगाम अखेर सुमारे ८६ लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते व शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होऊ शकते. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!” असं जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात कांद्याची किती निर्यात झाली ?
बंदी लागू होण्यापूर्वी चालू आर्थिक वर्षात कांद्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षातील एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत 16.26 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. मागील याच कालावधीत हा आकडा 15.19 लाख टन होता.
या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत कांद्याच्या निर्यातीत सुमारे 7 टक्के वाढ झाली आहे. मात्र, डिसेंबरपासून कांदा निर्यातीवर बंदी आल्यानंतर गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात एकूण कांदा निर्यात कमी होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात 25.25 लाख टन कांद्याची निर्यात झाली होती.