चेन्नई – तामिळनाडूमध्ये एका स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार आढळून आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम थांबवून निदर्शने केल्यानंतर कंपनीने एका आठवड्यासाठी पगारी रजा जाहीर केली आहे.
या संबंधात सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी जी निवासाची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी झालेल्या अन्नपुरवठयातून अनेक महिला आजारी पडल्या. नंतर या महिलांनी काम थांबवून 18 डिसेंबर रोजी जोरदार निदर्शने केली. त्याचबरोबर रस्ता रोको केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
हा कारखाना श्रीपेरूम्बुदूर येथे असून आता हळूहळू कामकाज सुरू करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाने या बाबीची दखल घेतल्यानंतर कामगार संघटना, स्थानिक प्रशासन आणि कंपनीच्या व्यवस्थापनादरम्यान त्रिपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर कंपनीने रविवारपर्यंत पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला.
नंतर हळूहळू कंपनीचे कामकाजात सुरू होणार आहे. खराब अन्न खाल्ल्यामुळे 159 कर्मचारी आजारी पडले आहेत. कामगार मंत्री टी एम अनुरासम यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप परत घेतला आहे. विषबाधेमुळे कुठल्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले असून या सदर्भात अफवा पसरऊ नये असे आवाहन केले आहे.