“सार्वजनिक जीवनातील 1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.” असा निर्णय आज यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडलेल्या ‘लोक माझे सांगाती’ आवृत्ती २ च्या कार्यक्रमात जाहीर केला आहे. शरद पवारांच्या या दोन वाक्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृह अक्षरश: हादरला. समोरील कार्यकर्त्यांमधून राजीनामा मागे घेण्याच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. ज्या माणसानं शरद पवारांना राजकारणात आणलं, मोठं केलं, मानसपुत्र मानलं, त्या यशवंतराव चव्हाणांच्या नावानं असलेल्या सभागृहातच पवारांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली, हा देखील एक योगायोग मानला जातोय.
सत्तेत असोत वा नसोत, बहुमतात असोत वा नसोत, शरद पवार ‘फॅक्टर’ महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक महत्वाचा मानला जातो. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख तसेच मी काय म्हातारा झालोय का? असा प्रश्न विचारून तरुणांना लाजवणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि गेली 50 दशक देश आणि राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेलं व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार यांची ओळख आहे.
शरद पवार यांचा राजकीय प्रवास-
गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या 11 मुलांपैकी शरद पवार हे एक आहेत. गोविंदराव हे 1940-50 च्या दशकात सहकार क्षेत्रात अग्रणी होते. तर आई शारदाबाई तीन वेळा जिल्हा मंडळाच्या अध्यक्ष होत्या. शरद पवार यांनी जन्मानंतर पाचव्याच दिवशी सभागृह पहिले त्यामुळे राजकारणाचे बाळ कडू त्यांना लहानपणापासूनच लाभले. शरद पवारांचे भाऊ शरदरावांनी शिकावे असा आग्रह धरत होते. पण पवार शिक्षणात सामान्य होते. चळवळी, सामाजिक आणि पुढे राजकारणातच त्यांचे मन जास्त रमले. पवारांचे इतर भाऊ मात्र उच्चशिक्षित झाले.
मुलगा शिकलेला आहे, पण काहीच करत नाही असे म्हणत सासरे झाले नाराज-
सदू शिंदे अर्थात सदाभाऊ शिंदे यांची मुलगी प्रतिभा शिंदे यांच्यासोबत पवारांचे 1 ऑगस्ट 1967 ला लग्न झाले. मुलगा शिकलेला आहे, पण काहीच करत नाही अशी माहिती ऐकून सासरे नाखूष होते. परंतु ज्यावेळेस लग्न झाले त्यावेळी शरद पवार आमदार होते. राजकारणात यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे गुरू होते. चव्हाणांनी आपल्या शिष्यातलं सामर्थ्य ओळखलं आणि 1967 साली म्हणजे वयाच्या 27 व्या वर्षीच पवारांच्या गळ्यात आमदारपदाची माळ गळ्यात पाडली होती. 1970 साली वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांचा मंत्री मंडळात गृहखात्याची जबाबदारी पवारांना मिळाली.
वयाच्या 38 व्या वर्षी बनले महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री-
शरद पवार वयाच्या 34 व्या वर्षी मंत्री झाले. त्यानंतर 1978 मध्ये पवारांनी ‘पुलोद’ च सरकार स्थापन करून वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. शरद पवार भाजपसोबत जातील की नाही असा प्रश्न आजही विचारला जातो. पण 1985 ला पुरोगामी लोकशाही आघाडीचे नेते होते, त्यामध्ये शेकाप आणि जनता पार्टीसोबत भाजपसुद्धा होता. या आघाडीनेच पवारांना विरोधी पक्षनेते बनवले. त्यानंतर जून 1997 ला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. त्यावेळी सीताराम केसरी, शरद पवार आणि राजेश पायलट हे अध्यक्षपदासाठी उभे राहिले. पवारांना 8 हजारांपैकी फक्त 882 च मतं त्यावेळी मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.
1999 मध्ये केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना-
10 जून 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रफुल्ल पटेल, पद्मसिंह पाटील, मोहिते पाटील, छगन भुजबळांसह अनेक बडे नेते काँग्रेस सोडून पवारांसोबत गेले. 2004 मध्ये दिल्लीत युपीएचे सरकार आले आणि पवारांनी या सरकारमध्ये कृषीमंत्री पद स्वीकारले होते. 2009 मध्ये पुन्हा युपीएचं सरकार आल्यानंतरही पवारांनी कृषी खात्यालाच पसंती दिली. 2012 साली पवारांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठा धक्का दिला. यापुढे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा त्यांनी 2014 च्या निवडणुकीपूर्वी दोन वर्षे आधी केली. आणि लोकसभेऐवजी राज्यसभेचा मार्ग निवडला.
क्रीडा क्षेत्रात दिले मोलाचे योगदान-
शरद पवार हे क्रीडा प्रेमी असल्याने त्यांनी क्रीडा क्षेत्रात महत्वाचे काम केले. आज IPL क्रिकेट लीग प्रचंड लोकप्रिय आहे. याचे श्रेय पवारांनाच जाते. ललित मोदींना प्रोत्साहन देऊन त्यांनी ही भारताची T-20 स्पर्धा जगातली सर्वोत्तम स्पर्धा बनवली. तसेच कुस्तीसह कबड्डीवरही पवारांचे मोठे प्रेम आहे. महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे ते अध्यक्षही होते. 1990 ला बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कबड्डीचा समावेश व्हावा यात पवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
‘रोजगार हमी योजना’ यशस्वी ठरवली –
शरद पवार यांनी रोजगार हमी योजनेची बीजे सर्वप्रथम बारामतीत रोवली. 1972 च्या दुष्काळात ‘फूड फॉर हंगर’ घोषणेमुळं पवारांचा स्वाभिमान दुखावला आणि त्यांनी बारामतीत ‘फूड फॉर वर्कर’ चा प्रयोग केला जो की आज रोजगार हमी योजनेचे मॉडेल ठरले आहे.
साताऱ्याच्या पावसातील सभेने बदलले राजकारण-
2019 च्या विधानसभा निवडणुकीतली पवारांची साताऱ्यातली भर पावसातील सभा प्रचंड गाजली होती. राष्ट्रवादी पक्षाला संजीवनी देणारी ही सभा ठरली. या सभेनं ऐन मतदानापूर्वी वातावरण बदलवून टाकलं आणि भाजप ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी,शिवसेना,आणि काँग्रेस अशी युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले.
दरम्यान, पवारांचं राजकारणात सक्रिय राहणं आज देखील महत्वाचं ठरतंय मग ते राज्याचे राजकारण असो किंवा देशाचं राजकारण प्रत्येक घडामोडी मध्ये शरद पवार हे महत्वाचे ठरता येत.