देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूच्या शासकीय गायरान जमिनीमध्ये असणारा कचरा डेपो शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. कचरा डेपो परिसरातील कचरा वाऱ्याने लगतच्या शेतामध्ये पसरतो. तसेच डेपोतील पेटविलेल्या कचऱ्यामुळे धूर, दुर्गंधी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. मात्र याबाबत नगरपंचायत दखल घेत नाही.
त्यामुळे कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने शेतकऱ्यांनी रोखली. त्यामुळे कचरा डेपोत कचरा टाकण्यास मंगळवारी (दि. 26) विरोध झाल्यामुळे देहूत कचरा ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.
तीर्थक्षेत्र देहू परिसरातील संकलित करण्यात येणारा कचरा बाह्यवळण (रिंगरोड) मार्गावरील शासकीय गायरान जमिनीवर असणाऱ्या खाणीत टाकण्यात येतो.
नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा व्यवस्थित खाणीत न टाकल्याने आणि परिसरातील नागरिकांकडूनही कचरा रस्त्यावरूनच फेकला जात असल्याने तसेच रात्री-अपरात्री हद्दीबाहेरील येणाऱ्या वाहनातून फेकले जाणारे कचरा रस्त्यांवरच तसेच खाण परिसरामध्ये अस्ताव्यस्त पडलेला असतो.
हा कचरा डेपो लगतच असणारे सुदाम भालेकर, श्रीधर भालेकर, शिवाजी काळोखे, आकाश काळोखे, भागुजी काळोखे, श्रीधर हगवणे यांसह अन्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाऱ्याने उडून जात आहे. पर्यायाने पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.
कचरा पेटविला जात असल्याने होणाऱ्या धुराने तसेच पसरणाऱ्या दुर्गंधीने शेती काम करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डेपो परिसरात पसरलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याने कुत्र्यांचा वावरही वाढला असून, शेतकऱ्यांच्या जनावरांना कुत्रे चावल्याचे तर कचरा खाल्ल्याने दीड वर्षांपूर्वी दोन गायींचा मृत्यू झाला. कचऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
दीड वर्षापूर्वी तात्कालीन ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारही केली आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने प्रशासनाला निदर्शनास आणून देण्यासाठी शेतकऱ्यांनी वर्षापूर्वी ही शेतकऱ्यांनी चर खोदल्याने चार दिवसांनी प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापही त्याकडे दुर्लक्ष झाले आहेत.
तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्षित केले जात असल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी कचरा वाहने अडवले होते.सकाळीच रोखलेल्या कचरा वाहने चौकामध्ये उभी करण्यात आल्यानंतर होणाऱ्या गैरसोयीने नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्याने कार्यालयाजवळच कचऱ्याच्या ढीग साचले आहेत. सकाळीच रोखलेल्या वाहनांमुळे कर्मचारीही बसून होते.
प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी कचरा वाहने अडवली होती. डेपो परिसरात संरक्षक भिती अथवा उंच पत्रे लावण्यात यावा, सुरक्षारक्षक नेमावा तसेच बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर, रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी माहिती शेतकरी आकाश काळोखे यांनी
दिली आहे.
कचरा खाणीत टाकून देऊ
यासंदर्भात मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. कार्यालयीन कारकून महेश वाळके यांच्याशी संपर्क साधला असता जेसीबी न भेटल्याने काम थांबले आहे. “जेसीबी’ने कचरा खाणीत टाकण्यात येईल, हे काम त्वरित करण्यात येईल, असे सांगण्यात आले.