– हिमांशू
“शेवटी सत्याचाच विजय होतो…’ गेल्या दोन-तीन दिवसांत एकाच प्रकरणासंदर्भात सात-आठ जणांच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि एक प्रामाणिक प्रश्न पडला. सत्याचा विजय नेहमी “शेवटी’च का होतो? “सुरुवातीला’ किंवा “मध्यात’ का होत नाही? कथा, कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट यांच्या बाबतीत “क्लायमॅक्स’चा क्षण म्हणजेच कथानकाचा उत्कर्षबिंदू म्हणून सत्याचा विजय शेवटी होणं एकवेळ ठीक आहे.
कथा-कादंबऱ्या किंवा नाटक-सिनेमे या वास्तव जीवनापासून प्रेरित झालेल्या कलाकृती होत किंवा त्या जीवनाचा, समाजाचा आरसा होत, असं सांगितलं जात असलं तरी सर्वसामान्यांच्या जीवनात एवढं “नाट्य’ भरणं विधात्यालाही शक्य होत नाही.
चार दिवसांपूर्वी नोंदवलेला गॅस सिलिंडर घेऊन एजन्सीचा माणूस आलाय, तो दिवाळीपूर्वी आला म्हणून आपण आनंदात आहोत, त्याला द्यायला नऊशे रुपये कधीचे तयार ठेवलेत; पण त्यानं सिलिंडरचा दर साडेनऊशे रुपये झाल्याचं सांगितल्यामुळे ऐनवेळी आपलं अवसान गळालंय.
घरातल्या सगळ्यांचे खिसे चाचपून वरच्या पन्नास रुपयांची सोय आपण करतो आणि पावती देताना तो “दिवाळी’ मागतो, तेव्हा आपल्या चेहऱ्यावर येणारे भाव कोणत्याही अभिनेत्यानं कॉपी करून दाखवावेत! या छोट्याशा कहाणीचा शेवट मात्र सत्याच्या विजयाने होतो. “आत्ता नाहीत; दोन दिवसांनी ये,’ असं आपण त्याला सांगतो आणि ते खरं असल्याचं त्याला केवळ आपला चेहरा पाहून पटतं, हा सत्याचा विजय!
एरवी सत्याचा पाठलाग करण्याच्या उद्देशानं जन्माला आलेली बातमीसुद्धा हल्ली आपल्याला सत्य सांगू शकत नाही. ती आपल्याला फक्त “घटना’ सांगते. तीही नाटक-सिनेमात शोभावी अशी..! त्या घटनेत थ्रिल असतं… अगदी टी-ट्वेन्टी मॅचसारखं! कहाणी असते… प्रदीर्घ डेलीसोपसारखी! ती कहाणी कधी, कुठे संपणार हे कुणालाच माहीत नसतं आणि त्यात कुणाला रसही नसतो. रस असतो मनोरंजनामध्ये, थ्रिलमध्ये… धक्कातंत्रामध्ये! “ब्रेकिंग’ म्हटलं की कान टवकारायचे आणि डोळे ताणून पाहायचं फक्त!
एकाच विषयावर दिवसाकाठी पाच-पाच पत्रकार परिषदा “कव्हर’ करायच्या; शिवाय त्या कहाणीतल्या पात्रांच्या मोटारींचा पाठलाग करायचा… “नो कॉमेन्ट्स’ म्हटलं तरी संबंधित व्यक्ती मोटारीत बसून निघून जाईपर्यंत प्रश्न विचारत राहायचं आणि नंदादीपासारखं अखंडित “कव्हरेज’ सुरूच ठेवायचं… एवढं सगळं केल्यावर सत्य शोधण्यासाठी वेळ मिळणार कुठून? जी व्यक्ती, ज्यावेळी, ज्या माध्यमातून बोलेल, तेच त्यावेळचं सत्य.
मग दुसऱ्या बाजूची एखादी व्यक्ती “काउंटर अटॅक’ करते तेव्हा ते सत्य! आणि गंमत म्हणजे दोन्ही व्यक्ती म्हणतात- “अखेर सत्याचाच विजय होतो!’ अशा कित्येक कहाण्या वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर जन्माला आल्या आणि तिथंच त्या संपल्यादेखील! निष्पन्न काय झालं, असं विचारलं तर सारेच चिडीचूप! कारण समोर नवीकोरी स्टोरी उभी!
तरीही मित्रांनो… पिक्चर अभी बाकी है! बरेच बॉम्ब राखून ठेवलेत… सर्वांनीच…! “वेळ येईल तेव्हा बोलेन,’ असं म्हणून सस्पेन्स ताणलाय. “जे काही बोलायचं ते कोर्टात बोला’ असं एकमेकांना सांगणारेही पत्रकार परिषदेत आणि सोशल मीडियावरच बोलताहेत. विषय किती का गंभीर असेना… देशाला कुरतडणारे अंमलीपदार्थ कुठे आणि कसे पोहोचतात? हे सगळं रोखायचं कसं? हे महत्त्वाचे प्रश्न नाहीतच! स्टोरीमधल्या गुंतागुंतीची नशा कायम राहणं सर्वाधिक महत्त्वाचं!