नगर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची पगाराबाबत होणारी दरमहाची हेळसांड थांबवावी, सेंट्रल बॅंक प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांना दरमहा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने जिल्हा परिषदेने सदरच्या बॅंकेतील खाते तातडीने दुसऱ्या बॅंकेत वर्ग करावे, पगार जमा करण्यास होणाऱ्या उशिराची चौकशी करावी अशी मागणी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी केली आहे.
जिल्ह्यात सुमारे बारा हजार प्राथमिक शिक्षक असून या सर्वांचे दरमहाचे वेतन जिल्हा परिषदेमार्फत अदा केले जाते. पगार बिलांना होणारा उशीर, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे उशिरा तयार होणारे चेक व हे सर्व झाल्यावर जिल्हा परिषदेचे खाते ज्या बॅंकेत आहे त्या सेंट्रल बॅंकेच्या प्रशासनाकडून पगार जमा करण्यास होणारी दिरंगाई यामुळे गेले काही वर्षे जिल्ह्यातील शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये दरमहा एक तारखेला पगार होत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कधीच एक तारखेला पगार होत नाही. सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी नेहमीप्रमाणे शिक्षकांच्या पगाराबाबत प्रशासकीय पातळीवर धिम्या गतीने काम चाललंय.
पगार करणारे सुध्दा कर्मचारीच आहेत हे विसरून कामकाज केले जाते .शिक्षकांच्या पगारापोटी दरमहा 40 ते 45 कोटी रुपये अदा केले जातात. सदरची रक्कम जिल्हा परिषदेचे खाते नगर मधील सेंट्रल बॅंकेत असल्याने प्रथम तेथे चेक दिला जातो. तिथून तो प्रत्येक शिक्षकाच्या वेगवेगळ्या बॅंकेत असलेल्या खात्यांवर जमा होतो. सेंट्रल बॅंकेत ज्या शिक्षकांची खाती आहेत त्यांच्या खात्यावर सुद्धा चेक जमा होण्यास तीन दिवस लागतात. इतर शिक्षकांना आठवडाभर वाट पाहावी लागते.