डोर्लेवाडी (पुणे जिल्हा) – येणाऱ्या काळामध्ये दोन आपत्त्यावरच थांबावे, असा सल्ला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागरिकांना दिला आहे. ग्रामपंचायत डोर्लेवाडी (ता.बारामती) यांच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक स्मृती स्तंभ, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत नागरी सुविधा केंद्र व इतर विकासकामांचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले, यावेळी आयोजित केलेल्या सभेत पवार बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माळेगाव कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, राष्ट्रवादी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे संचालक मदनराव देवकाते, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे, छत्रपती कारखान्याचे संचालक नारायण कोळेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर, डोर्लेवाडी गावचे सरपंच पांडुरंग सलवदे, उपसरपंच संदीप नाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशाची लोकसंख्या फक्त 35 कोटी होती; मात्र आता ती लोकसंख्या सव्वाशे कोटीवर जाऊन पोहोचली आहे. यामुळे दोनच आपत्त्यावर थांबावे. व्यसनापासून दूर राहावे. व्यसनामुळे यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. दारू, ताडी पिऊन कोणाचही चांगलं झालेलं नाही. संसाराची राख रांगोळीच होते. बारामती तालुक्यातील गुणवडी, झारगडवाडी, सोनगाव मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हातभट्टी, ताडी विक्री केली जाते, यावर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना पोलिसांना अजित पवार यांनी दिल्या.
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे उत्कृष्ट काम केलेल्या आणि आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेल्या सरपंच पांडुरंग सलवदे यांचा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जाहीर सत्कार केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांचे बलिदान समाज कधीच विसरू शकत नाही. स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचे अनुकरण करत असतानाच आजच्या तरुणांनी आपल्या कार्याचा इतरांना अभिमान वाटावा असे काम केले पाहिजे, असे मत अजित पवार यांनी केले. यावेळी डोर्लेवाडीतील १०२ वयाचे स्वातंत्र्य सैनिक साहेबराव दळवी यांचा देखील जाहीर सत्कार केला.