नवी दिल्ली – हरियाणामधील नूह जिल्ह्यामध्ये एका धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक झाल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अन्य भागांमधून पोलिसांची कुमक देखील मागवावी लागली आहे. अफवा आणि चिथावणीखोर संदेश पसरवले जाऊ नयेत म्हणू या परिसरातील इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली आहे.
नूह भागातल्या ब्रिज मंडल जलाभिषेक यात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला असे पोलिसांनी सांगितले. नूह मधील खेडला मोद येथे काही युवकांच्या गटाने ही यात्रा रोखली होती आणि यात्रेवर दगडफेक करायला सुरुवात केली होती. या दगडफेकीमुळे यात्रेतील 1-2 कारचे नुकसान देखील झाले होते. या दगडफेकीला प्रत्युत्तर देण्यासाठी यात्रेतील सहभागी व्यक्तींनीही समाजकंटकांवर दगडफेक करायला सुरुवात केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या यात्रेला गुरुग्राममधील सिव्हील लाइन येथून भाजपचे जिल्हाध्यक्ष गार्गी कक्कर यांनी प्रारंभ करून दिला होता. यात्रेबरोबर पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे हा तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नूह येथे तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलीस अधिकारी कुकम सिंह यांनी सांगितले.