मुंबई – अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक जवळजवळ 11 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसात बरीच नफेखोरी होऊन निर्देशांक कमी झाले होते. मात्र जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येत असल्यामुळे बड्या कंपन्यांच्या शेअरची निवडक खरेदी झाली. त्यामुळे निर्देशांकात वाढ होऊन ते नव्या विक्रमी पातळीवर केले.
रिलायन्स कंपनीचा शेअर चार टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर सनफार्मा, पावर ग्रिड, बजाज फायनान्स, नेस्ले, एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र टायटन, एचडीएफसी बॅंक आणि आयटीसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 222 अंकांनी म्हणजे 0.43 टक्क्यांनी वाढून 51,531 विक्रमी पातळीवर बंद झाला. निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 66 अंकांनी वाढून 15,173 अंकांवर बंद झाला.
सकाळी शेअर बाजारात फारशी खरेदी झाली नव्हती. मात्र सायंकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर वाढल्यानंतर इतर काही कंपन्यांच्या शेअरची खरेदी होऊन निर्देशांकांना आधार मिळाला, असे रिलायन्स सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले.