मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक शुक्रवारी 1.56 टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य एकाच दिवसात 4.47 लाख कोटी रुपयांनी कमी झाले. शुक्रवारी शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे बाजारमूल्य 4.47 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 255 लाख कोटी रुपयांवर आले.
जागतिक बाजारात विक्री होत असतानाच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकावर परिणाम झाला आहे. केवळ भारतातच शेअर बाजाराचे निर्देशांकात कोसळत नाहीत तर हॉंगकॉंग, चीन, दक्षिण कोरिया, जपान इत्यादी देशातील शेअर बाजाराचे निर्देशांकही कमी होत आहेत.
रशिया- युक्रेन युद्ध सुरू असल्यामुळे क्रूडच्या किमती आणखी वाढत आहेत. त्याचा परिणाम भारतासारख्या देशावर जास्तच दिसून येत आहे असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्ही. के विजयकुमार यांनी सांगितले. त्यामुळे परतावा न देणाऱ्या क्षेत्रातून गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेऊन इतर क्षेत्राकडे वळत असल्याचे वातावरण सध्या आहे. नजीकच्या भविष्यामध्ये परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले.