मुंबई – बरेच विश्लेषक शेअरबाजारात करेक्शनची शक्यता बळावली असल्याचे सांगत असले तरी देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारात खरेदी चालूच आहे त्यामुळे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 166 अंकांनी वाढून 58,296 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 54 अंकांनी वाढून 17,377 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 680 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. अमेरीकेची रिझर्व्ह बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने वर्षाअखेरपर्यंत व्याजदरात कपात न करण्याचे संकेत दिल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत.
त्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर असूनही निर्देशांकात वाढ चालू आहे. अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अमेरिका मवाळ पतधोरण आगामी काही महिने तरी जाहीर करत राहण्याची शक्यता वाढली आहे.
त्यामुळे भांडवल सुलभता कायम राहण्याची शक्यता आहे. अमेरीकेबरोबरच युरोप आणि आशियाई शेअर बाजारातून सकाळी सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीत चालू ठेवली. इन्फोसिस कंपनी बरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीज. टेक महिंद्रा, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. मात्र या खरेदीच्या वातावरणातही इंडसइंड बॅंक, कोटक बॅंक, पावर ग्रीड, सन फार्मा, एशियन पेंट्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
सरलेल्या आठवड्यांमध्ये सेन्सेक्स 2005 अंकांनी वाढल्यामुळे सेन्सेक्स संबंधातील पहिल्या दहा पैकी नऊ कंपन्यांच्या बाजार मूल्यात तीन लाख कोटी रुपयांची वाढ झाली. यामध्ये रिलायन्स कंपनीचा मोठा वाटा आहे. भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, स्टेट बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावामध्ये गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.