हिमांशू
स्वदेशीच्या ज्या मंत्रामुळे स्वातंत्र्यप्राप्तीचा मार्ग सुकर झाल्याचं इतिहासात वाचायला मिळतं, त्या स्वदेशीबद्दल आजच्याइतकं कन्फ्यूजन पूर्वी कधीच झालं नव्हतं. स्वदेशीचा तो नारा आजही आहे, “आत्मनिर्भर भारता’चं स्वप्नही आहे; परंतु त्याच वेळी परदेशी गुंतवणूक आली की आम्हाला अतोनात आनंद होतोय आणि त्याचं कारण सापडत नाहीये.
अर्थशास्त्राचं आमचं ज्ञान यथातथाच असलं तरी गुंतवणूक ही सामान्यतः नफ्यासाठी केली जाते, हा प्राथमिक धडा नक्की आठवतो. परंतु आता गुंतवणूक येणार म्हणजे रोजगार मिळणार, यापलीकडे काही ऐकायलाच मिळत नाही आणि मग वाटू लागतं, अर्थशास्त्राचा अभ्यास जरा अधिक मन लावून केला असता तर बरं झालं असतं.
अठ्ठावीस वर्षांपूर्वी जगातल्या सगळ्या देशांच्या अर्थव्यवस्था खुल्या करणारे देश आता स्वतःच्या अर्थव्यवस्थेची खिडक्या-दारं का बंद करू लागलेत, याचं उत्तर सापडत नाही. तज्ज्ञ मंडळी याला “आर्थिक हितरक्षणवाद’ असं नाव देतात आणि “आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना त्याच्याशी मिळतीजुळती वाटते.
तेवढ्यात गुगलची भारतात 75 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा होते आणि आम्ही खूश होतो. वास्तविक “गुगल म्हणजे माहितीचा खजिना’ याहून अधिक माहिती आम्हाला नाही. “गुगलचंही एक मंदिर असायला हवं,’ असा अक्षयकुमारचा डायलॉग आठवतो आणि फारतर यूट्यूबवर बघितलेल्या एका कवितेतलं “रोटी गुगल से डाउनलोड नही होती,’ हे वाक्य आठवतं.
या पार्श्वभूमीवर गुगल भारतात गुंतवणूक करणार म्हणजे नेमकं काय करणार, याचा विचार करत असतानाच “डिजिटल इंडियाला बळ मिळेल’, असं वाक्य वाचायला मिळालं. “म्हणजे नक्की काय होईल,’ हा प्रश्न पडलाच; पण मग समजलं की ग्रामीण आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, शिक्षण, कृषी अशा सर्वच क्षेत्रांत डिजिटलीकरण होणार. तंत्रशिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार मिळणार. ग्रामीण अर्थव्यवस्थेला डिजिटलीकरणाच्या माध्यमातून बळ मिळणार.
“ते कसं काय,’ हा प्रश्न आम्ही अडाणी ठरण्याच्या भीतीनं गिळला. तेवढ्यात कळलं की, डन्झो नावाच्या प्लॅटफॉर्मवरून देशातल्या फूड डिलिव्हरी क्षेत्रात गुगल उतरण्याची शक्यता आहे आणि या सेवेची चाचणीही कंपनीनं सुरू केलीय. स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांना त्यामुळे मोठी टक्कर मिळेल आणि गुगलची या क्षेत्रातली एन्ट्री “गेमचेंजर’ ठरेल, असंही बोललं जातंय.
ई-कॉमर्स क्षेत्रातली ऍमेझोन ही मोठी कंपनीही नुकतीच भारतात फूड डिलिव्हरीच्या व्यवसायात उतरलीय. एकंदरीत आम्हाला घरबसल्या खाऊ घालण्याच्या व्यवसायात या सगळ्या मोठ्या कंपन्यांना रस आहे. “रोटी गुगल से डाउनलोड नही होती,’ हे वाक्य एवढ्या लवकर खोटं ठरेल असं वाटलं नव्हतं. अर्थात गुगलवरून डाउनलोड होणारी “रोटी’ भलतीच महागडी असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
जगातल्या काही मोजक्या कंपन्या सगळ्याच प्रकारच्या व्यवसायात उतरताना दिसतायत. ज्या व्यवसायात त्या उतरतील, त्या क्षेत्रातले “छोटे मासे’ घाबरतायत. गुगल करीत असलेल्या गुंतवणुकीला “गुगल फॉर इंडिया डिजिटायजेशन फंड’ असं नाव दिलेलं असलं तरी हे डिजिटायजेशन नक्की कुठं आणि कसं होणार, हा आमच्या मनातला प्रश्न वाटतो तेवढा बावळटपणाचा नाही, असा दिलासा मिळालाय. आज घरपोच “विदेशी खाऊ’ पोहोचवणाऱ्या या कंपन्या उद्या आपल्याला घासही भरवतील, याची खात्री वाटतेय.