मुंबई – राज्य सरकारने आता गाव पातळीवरील करोना नियंत्रणासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी त्यांनी करोनामुक्त गावासाठी बक्षिस योजना जाहीर केली आहे. यात पहिले बक्षिस 50 लाखांचे असेल, दुसरे 25 लाखांचे असेल या प्रमाणात ही बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. ही योजना स्पर्धात्मक स्वरूपात असणार आहे. करोना निर्मुलनासाठी चांगले काम करणाऱ्या पहिल्या तीन गावांना ही पारितोषिके दिली जाणार आहे. तिसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक 15 लाख रूपयांचे असणार आहे.
राज्यातील प्रत्येक महुसल विभागातून तीन गावे यासाठी निवडली जाणार असून त्यामुळे एकूण अठरा गावांना हे पुरस्कार मिळणार आहेत. एकूण बक्षिसे 5 कोटी 40 लाखांची असतील.
विजयी गावांना त्यांनी जिंकलेल्या बक्षिसा खेरीज तेवढ्याच रक्कमेचे अनुदानही दिले जाणार असून त्यातून त्यांना गावातील विकास कामे करता येणार आहेत. सोलापुर जिल्ह्यातील घाटणे गावचे तरूण सरपंच श्रृतुराज देशमुख यांनी आपले गाव करोनामुक्त केल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारच्या आपल्या भाषणात त्याचे कौतुक केले होते.
अन्यही सरपंचांचा त्यांनी उल्लेख करीत त्यांच्या प्रमाणेच अन्य गावांच्या सरपंचांनीही आपले गाव करोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.