पुणे -हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम मागील दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. मेट्रोसाठी आवश्यक असलेल्यापैकी 98 टक्के जागा ताब्यात आल्या आहेत. तरीही, प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. येत्या आठ दिवसांत या मेट्रोचे काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले. दरम्यान, वेळप्रसंगी बेमुदत उपोषणाचा इशाराही बापट यांनी पीएमआरडीएला दिला आहे.
यासंदर्भात बापट यांनी पीएमआरडीए आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची भेट घेतली. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नीलिमा खाडे, आदित्य माळवे, प्रकाश ढोरे, हर्षाली माथवड, पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, भाजपचे प्रसिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, या मेट्रोसाठी केंद्र व राज्य सरकार निधी देणार आहे. टाटा कंपनीला हे काम देण्यात आले आहे. मात्र, करारनाम्यात 100 टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय मेट्रोचे काम सुरू करणार नसल्याची अट समाविष्ट केली आहे. आता 98 टक्के जागा ताब्यात आल्या आहेत.
त्यामुळे मेट्रोचे काम सुरू होणे अपेक्षित आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या निर्णयासंदर्भात सहकार्याची भूमिका घेतली. पुढील 100 वर्षांचे नियोजन पाहता हा पूल पाडणे आवश्यक होते. आता मात्र काम सुरू होणे आवश्यक आहे.’