कोपरगाव – कोपरगाव शहरात नुकताच लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि शहरातील महिला व मुलींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या मुलींचे पालक मुलींच्या सुरक्षिततेसाठी विवंचनेत सापडले आहे. महाविद्यालये सुरू झाल्यामुळे बस स्थानकात वाढलेला टवाळखोरांचा बंदोबस्त कुणी करावा? असा सवाल पालकांना पडलेला असून, याबाबत पोलिसांनी खमकी भूमिका घेण्याची गरज आहे.
कोपरगाव शहरात विविध महाविद्यालये व हायस्कूल असून या ठिकाणी तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक मुली शिक्षणासाठी बसने ये-जा करत असतात. मात्र, शाळा, महाविद्यालयामध्ये जाणाऱ्या मुलींना बस स्थानकावर टवाळखोर मुलांच्या टोळ्यांना बघून भितीने खाली मान घालून जाण्याची वेळ आली आहे. पालकांमध्येही भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या या टवाळखोरांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करण्याची पालक वर्गाची अपेक्षा आहे. मीागल आठवड्यात लोकस्वराज्य आंदोलनचे ऍड.नितिन पोळ यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती. मात्र, अद्याप त्यावर कुठलीही उपाययोजना झालेली दिसत नाही.
बस स्थानकात गर्दीत मुलींच्या आसपास घोंगावणे, हावभाव करणे असे अनेक प्रकार बस स्थानकातून बस निघेपर्यंत या टवाळखोरांचे सुरू असतात. असाच प्रकार महाविद्यालये आणि शाळा परिसरात दिसून येतो. अनेक टवाळखोर मुले दुचाकी गाड्या घेऊन या शाळा, महाविद्यालयाच्या आजूबाजूला फिरतात. मुलींना पाहून हॉर्न वाजवणे, गाड्यांवर जाताना कट मारणे, असे प्रकार होताना दिसतात.
कोपरगाव पोलीस स्टेशनने अशा टवाळखोर मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम उघडावी, शाळा, महाविद्यालयाच्या आजूबाजूला बस स्थानकावर अशी टवाळखोर मुले विनाकारण फिरताना दिसली तर ताबडतोब गुन्हे दाखल करून कायमचा बंदोबस्त करण्याची सध्यातरी गरज आहे.
महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर सीसीटीहीच्या निगराणीत आहे.टवाळखोर मुलांना संरक्षण कर्मचाऱ्यांनी चोप देऊन आम्ही त्यांना समज दिलेली आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॉलेज प्रांगणात कुणीही टवाळखोर आढळल्यास गुन्हा दाखल करणार आहे. बस स्थानकावरील बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षकांना पत्र देणार आहे.
डॉ.आर.आर. सानप
प्राचार्य, एस.एस.जी.एम.महाविद्यालय