पाथर्डी(प्रतिनिधी) – तालुक्यातील करोडी, मोहटा, कारेगाव व आसपासच्या गावांना पिण्याचे पाण्याचे टॅंकर सुरू करण्याची मागणी तालुका प्रशासनाकडे करण्यात आले आहे. याबाबत नायब तहसीलदार मुरलीधर बागुल यांना निवेदन देण्यात आले. योगेश गोल्हार, संदीप खेडकर, हरिभाऊ चोरमले, सचिन गोल्हार, बाबासाहेब गोल्हार, सचिन गोल्हार, किरण खेडकर, कृष्णा खेडकर, विठ्ठल खेडकर आदींनीच्या स्वाक्षरीने हे निवेदन दिले आहे.
करोडी व आसपासच्या गावात इतर भागांमध्ये प्रमाणामध्ये दुष्काळ झाला आहे. मागील पंधरा दिवसांपासून गावामध्ये व गावातील परिसरामध्ये पाण्याची अत्यंत कमतरता भासत असून विहिरींना, बोअरला कुठेही पाणी नाही. पाण्याची पातळी खाली गेली असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लोक ऊस तोडीला गेले असून गावामध्ये वृध्द व लहान मुले आहेत.
दुष्काळी परीस्थिती असून कोणत्याही प्रकारचे टॅंकर चालू केले नाही. गेले एक महिन्यांपासून तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडे सातत्याने पिण्याचे पाण्याचे टॅंकर मिळावे, यासाठी टॅंकरची मागणी प्रस्ताव पाठवलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.
प्रशासनाने आमच्या यापूर्वी केलेल्या मागणी प्रस्तावाची कोणतीही दक्षता घेतले नाही. याचा निषेध म्हणून सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी या करोडी गावामध्ये पाथर्डी- बीड या महामार्गावरती रस्तारोको आंदोलन करणार आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.