नगर -उपकेंद्र सहाय्यक पदासाठी एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अहमदनगरच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करुन ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर पाटील, जिल्हा समन्वयक बाळासाहेब पवार, रामदास भोर, बाळासाहेब हराळ, राजेंद्र भागवत, विशाल कोकाटे, विशाल म्हस्के, सर्जेराव शिंदे, किरण तराळ, प्रवीण थोरात, अनिकेत आवारे, प्रशांत काळे, सचिन रेडे, राजेंद्र भोर, गणेश थोरात, सागर बडे, राहुल काळे, प्रशांत लवांडे, श्रीपाद दगडे, गोरख आढाव, चंदू नरवडे, राम झीने आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरण विभागात उपकेंद्र सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. त्या अनुषंगाने एक व दोन डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी महावितरणच्या अधिक्षक अभियंता कार्यालयात होत आहे. परंतु या कागदपत्र पडताळणीमधून मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. हा मराठा समाजावर अन्याय आहे. एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचीसुद्धा कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात यावी, मराठा समाजातील मुलांना भरतीप्रक्रियेत डावलून एक प्रकारे मराठा समाजाची अवहेलना केली जात आहे. याविरोधात मराठा समाजात प्रचंड संतापाची भावना आहे.
राज्य सरकार व महावितरणाच्या उपरोक्त कृतीचा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा जाहीर निषेध करीत असून उपरोक्त चूक तात्काळ सुधारण्यात यावी, अन्यथा मराठा समाजातून या विरोधात तीव्र प्रक्रिया उमटल्याशिवाय राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.