श्रीनगर – वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 जणांचा मृत्यू झाला. त्याला केवळ मंदिर मंडळाचे गैरव्यवस्थापन कारणीभूत असल्याचा आरोप या दुर्घटनेत बचावलेल्या भाविकांनी केला आहे. मात्र, श्री माता वैष्णोदेवी मंदिर मंडळाने हा आरोप फेटाळला आहे. गर्दीची शक्यता गृहीत धरून सर्व व्यवस्था केली असल्याचा दावा मंडळाने केला आहे. तर जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंग यांनी किरकोळ वाद या दुर्घटनेसाठी कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे.
या शोकात्मक दुर्घटनेसाठी केवळ गैरव्यवस्थापन कारणीभूत आहे. त्यांना गर्दीची कल्पना होती तरी त्यांनी बेसुमार भाविकांना दर्शनासाठी सोडले, असे उत्तर प्रद्रेशातील गझियाबादहून आलेल्या भाविकाने सांगितले. तो शवागराबाहेर मृतांची ओळख पटवण्यासाठी थांबला होता. आपले नाव न छापण्याच्या अटीवर या भाविकाने सांगितले की, जर भाविकांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती.
अशीच घटना काही मिनिटे आधी घडली होती. पण नशिबाने कोणाला इजा झाली नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आली. आम्ही दहा शेजाऱ्यांचा गट दर्शनासाठी आला होता. प्रचंड गर्दीमुळे ही दुर्घटना झाली. नागरिक ये जा करत होते. प्रत्येकालाच घाई होती, असे त्यांनी सांगितले.
अनेक जण दर्शन झाल्यानंतर परत जाण्याऐवजी तेथेच रेंगाळत होते. त्यामुळे भवनमध्ये गर्दी वाढल्याची पुस्ती त्यांनी जोडली. अरुण प्रताप सिंह (वय 30) म्हणाले, या दुर्घटनेत मी माझा मित्र गमावला आहे. आम्ही गोरखपूरहून आलो होतो. भवनमध्ये खूपच गर्दी होती. या मंदिरात दर्शनासाठी मी आलो होतो. मात्र यावेळी झालेली गर्दी पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर आम्ही असहाय्य असल्याची भावना निर्माण झाली. सहा वाजेपर्यंत मदतही पोहोचली नव्हती.
बिहारच्या मुझफ्फरपूरच्या रहिवासी असणाऱ्या राणी देवी म्हणाल्या आमचा मृत्यू टळला. आम्ही नशीबवान आहोत. पण जमिनीवर पडलेले अनेक लोकांचे मृतदेह पाहणे हे मन पिळवटून टाकणारे होते. भवनमध्ये झालेली भाविकांची अनियंत्रित गर्दीच या दुर्घटनेचे कारण आहे. या चेंगराचेंगरीत देवीला लोटांगण घालणारे अनेक जण चिरडले गेले. या मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या कात्रा येथील तळावरूनच अनेक जण दर्शन न घेताच परत गेले, असे आदित्य शर्मा या भाविकाने सांगितले.