पुणे –महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 8 नोव्हेंबरपासून संप पुकारला आहे. दीड महिन्यानंतरही संप कायम असून, विलीनीकरणापर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
संपाच्या दीड महिन्यानंतर देखील अद्यापही शेकडो बसेस जागेवरच आहेत. संपानंतर काही दिवसातच परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. सोमवारी देखील परब यांनी न्यायालयाच्या सुनावणीनंतर कर्मचाऱ्यांवर कामावर रूजू होण्याचे आवाहन केले. तर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी संपातून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. पण, पुण्यातील संप कायम आहे.
कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा संप नसून, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून हा दुखवटा आहे. कोणत्याही संघटनेचा हा संप नाही. कर्मचाऱ्यांची ही एकजूट आहे. कोणताही कामगार स्वत:हून कामावर गेला नसून, राज्यात सर्व आगारांत दुखवटा सुरूच आहे. विलीनीकरण होईपर्यंत हे कायम राहणार आहे.
– प्रकाश निंबाळकर, कर्मचारी
प्रवासी आमचे दैवत असून, त्यांना आम्ही वेठीस धरणार नाही. आमच्या घरातील 55 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जनतादेखील सुज्ञ आहे. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. आर्थिक नियोजन, प्रशासनाचा दबावातून कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे राज्य शासनात विलीनीकरण होईपर्यंत कर्मचारी माघार घेणार नाहीत.
– राजेंद्र मेश्राम, कर्मचारी