विश्वस्त मंडळ शुक्रवारी कोल्हापुरात जाऊन गाव ठरवणार
जेजुरी- कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्तांना नुसताच शब्दाने दिलासा देत सांत्वन करण्यापेक्षा त्यांना पुन्हा आपले घरटे, आणि कोलमडून पडलेला संसार उभा करण्यासाठी आर्थिक मदतीची प्रचंड गरज आहे. ही मदत प्रत्यक्ष जाऊन केली तरच त्यांना उभारी धरता येईल. त्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना-मार्गदर्शनाखाली कोल्हपूर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी भरीव मदत करण्याचा निर्णय खंडेरायाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
यावेळी प्रमुख विश्वस्त अशोक संकपाळ, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.कोल्हापूर-सांगली जिल्ह्यामधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते व राज्यातील प्रमुख धार्मिक न्यासंकडून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मात्र, प्रचंड पुरामुळे मोडून पडलेली घरे आणि संसार उभा करणे हे मोठे आव्हान पूरग्रस्तांपुढे आहे.
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून जेजुरी देवसंस्थान वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू-धान्य, किराणा संसारपयोगी भांडी, आवश्यक तेथे घर डागडुजीसाठी मदत, शालेय साहित्य, स्कूल बॅग, पिण्याचे पाण्याच्या बाटल्या आदींची मदत प्रत्यक्ष जाऊन करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांचेशी संपर्क करण्यात आला असून त्यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार एक गाव दत्तक घेऊन ही मदत केली जाणार आहे, असे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले. यासाठी शुक्रवारी (दि. 16) विश्वस्त मंडळ कोल्हापूर येथे जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत व त्यांचे मार्गदर्शन सूचनेनुसार दत्तक गाव ठरविणार आहेत.
- देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांरी एक दिवसाचे वेतन देणार
मार्तंड देवसंस्थान च्या सुमारे 70कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसांचे वेतन पुरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये लेखाविभाग, सुरक्षा, स्वच्छता, अन्नदान, विभाग चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अधिकारी वर्गासह महिला, पुरुष कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसांचे वेतन दत्तक घेण्यात येणाऱ्या गावासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.