आंबेठाण- करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून चाकण नगरपरिषदेच्या वतीने चाकण शहरात जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. करोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसे खबरदारी घेत असून, चाकण नगरपरिषदेच्या वतीनेही जंतुनाशक फवारणीसह धूळ फवारणी केली जात आहे. त्याचप्रमाणे जनजागृतीसाठी मोक्याच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच काही दानशुरांनी दवाखान्यातील रुग्णांना मोफत जेवणाची सोय केली आहे. शहरात दुर्गंधी पसरू नये, यासाठी रोजच्या रोज कचरा तातडीने उचलला जात आहे.
नागरिकांनी घरात साचलेला ओला सुका कचरा रस्त्यावर अथवा अन्य कोठेही न फेकता कचरा गाडीतच टाकावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून केले जात आहे. चाकण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. नीलम पाटील यांनी सांगितले की, चाकण शहरात कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसर स्वच्छ करून घेतला जात आहे. नगरपरिषदेच्या वतीने दररोज टेकटरच्या सहाय्याने जंतुनाशक व धूळ फवारणी केली जात आहे.