मेलबर्न – भारतीय संघाने अखेर बॉक्सिंग डे कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला व चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. अजिंक्य रहाणेच्या 12 व्या शतकाच्या सामन्यात संघाच्या विजयांची मालिका कायम राहिली.
ॲडलेडला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर नियमित कर्णधार विराट कोहली, शमी यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीतही भारतीय संघाने हा सामना जिंकला. कर्णधार अजिंक्य रहाणेचे पहिल्या डावातील शतक तसेच दुसऱ्या डावातील आश्वासक खेळी आणि भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा यांमुळे या सामन्यात भारतीय संघाने यजमानांना चारीमुंड्या चीत केले.
तिसऱ्या दिवसाच्या 6 बाद 133 वरून पुढे खेळ सुरू झाल्यानंतर कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने संयमी फलंदाजी करत संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र, भारतावर दडपण ठेवण्यासाठी ते पुरेसे ठरले नाही. त्यांचा डाव संपला आणि भारतासमोर विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य निर्माण झाले.
ग्रीन व कमिन्स चांगले खेळत असताना त्यांच्या संघाला शतकी धावसंख्येची अपेक्षा होती. मात्र, जसप्रीत बुमराहने कमिन्सला बाद करत त्यांना धक्का दिला. त्यानंतर ग्रीनही महंमद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 45 धावांची खेळी केली. सातव्या गड्यासाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्या 57 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव लांबला.
पुढील सामनेही मेलबर्नवर
या दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना येत्या 7 ते 11 जानेवारीदरम्यान होणार आहे. ही लढत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. पण तेथे करोना रुग्णांची संख्या वाढल्याने ही लढत तसेच चौथी कसोटीदेखील मेलबर्न मैदानावर होण्याची शक्यता आहे.
ही जोडी फुटल्यावर नाथन लॉयनही बाद झाला. त्यानंतर जोश हेजलवूड आणि मिशेल स्टार्क जोडीने भारताला त्रस्त केले होते. अश्विनने हेझलवूडचा त्रिफळा उडवला व यजमान ऑस्ट्रेलियाचा डाव 200 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून महंमद सिराजने 3, बुमराह, अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी 70 धावा करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयंक आग्रवाल केवळ 5 धावांवर मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा यालाही अपयश आले. तो केवळ 3 धावांवर बाद झाला. यानंतर मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणेने शुभमन गिल याच्या साथीत डाव सावरला व संघाचे आणखी नुकसान न होऊ देता संघाचा विजय साकार केला. गिलने 35 तर रहाणेने 27 धावांची नाबाद खेळी केली.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 195. भारत पहिला डाव – 326. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 103.1 षटकांत सर्वबाद 200 धावा. (मॅथ्यू वेड 40, मार्नस लेबुशेन 28, ट्रॅव्हिस हेड 17, कॅमेरून ग्रीन 45, पॅट कमिन्स 22, महंमद सिराज 3-37, रवींद्र जडेजा 2-28, जसप्रीत बुमराह 2-54, उमेश यादव 1-5, रवीचंद्रन अश्विन 2-71). भारत दुसरा डाव – 15.5 षटकांत 2 बाद 70 धावा. (शुभमन गिल नाबाद 35, अजिंक्य रहाणे नाबाद 27, मिशेल स्टार्क 1-27, पॅट कमिन्स 1-22).