ज्यांच्या राजकीय एन्ट्रीमुळे केवळ तामिळनाडूच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारतातील राजकीय चित्र बदलू शकले असते, अशा सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय घोषित करून त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का दिला आहे. परवाच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आणि त्यांनी आज आपल्या चाहत्यांना आणि समर्थकांना उद्देशून एक जाहीर पत्र लिहून राजकारणात न पडण्याचा निर्णय आपण घेतला आहे, असे कळवले आहे. त्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली आहे. हा निर्णय घेणे किती क्लेषदायक आहे याची माझ्या खेरीज कोणालाही कल्पना येणार नाही, पण अत्यंत दु:खी अंतकरणाने आपण हा निर्णय घेत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
रजनीकांत हे 70 वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती सध्या विविध प्रकारच्या आजाराने नाजुक झाली आहे, हे खरे आहे. त्यातच डॉक्टरांनीही त्यांना ऊन आणि धूळ यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. करोनापासून वाचण्याचीही दक्षता घ्या, असेही त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सुचवले होते. परंतु तरीही त्यांनी 3 डिसेंबर रोजी आपला राजकारण प्रवेश करण्याचा इरादा असल्याचे घोषित करून मोठीच सनसनाटी उडवून दिली होती. त्यांनीच जाहीर केलेल्या निर्णयानुसार येत्या 31 डिसेंबर रोजी ते आपल्या पक्षाची घोषणा करणार होते व पाच महिन्यांनी होणाऱ्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार होते. राजकारण प्रवेशाबाबत “नाऊ ऑर नेव्हर’ असा उल्लेख देखील त्यांनी स्वत:च केला होता. पण नुकताच त्यांना रक्तदाबाचा पुन्हा त्रास सुरू झाल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी पहिली घोषणा “राजकारण नकोरे बाबा!’ अशी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत. त्यांना हाताशी धरून तामिळनाडूत शिरकाव करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला होता. पण रजनीकांत यांच्या या निर्णयामुळे भाजपची सर्वात मोठी गोची झाली आहे.
वास्तविक भाजपने अद्रमुकशी जुळवून घेत त्यांच्याशी आघाडी करण्याचा मनोदय जाहीर केला होता. पण रजनीकांत यांनी राजकारण प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने अद्रमुकला वाऱ्यावर सोडून आम्ही अद्रमुकबरोबर राजकीय आघाडी करण्याचा अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही, अशी पलटी खाल्ली होती. भाजपला रजनीकांतबरोबर सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पडू लागली होती. पण रजनीकांत यांच्या आजच्या निर्णयामुळे भाजपच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. भाजपचे आणखी दुर्दैव असे की, त्यांनी खाल्लेली पलटी लक्षात घेऊन दोनच दिवसांपूर्वी अद्रमुक पक्षाने भाजपला असा सज्जड इशारा देऊन ठेवला आहे की, आता तेथे भाजपला कोणी त्राताच उरला नाही. अद्रमुकने आपल्या एका राजकीय मेळाव्यात भाजपबाबत स्पष्ट भूमिका घेत नमूद केले आहे की आम्ही भाजपबरोबर युती केली आणि आमची युती सत्तेवर आली तरी भाजपला आम्ही सरकारमध्ये स्थान देणार नाही. कारण भाजप हा द्रविडी संस्कृतीतील पक्ष नाही. त्यामुळे त्यांना तामिळनाडूच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावता येणार नाही.
पलानीस्वामी यांनाच त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून मान्यता द्यावी लागेल. अद्रमुकनेच इतकी अवहेलना केल्यानंतर भाजपची तामिळनाडूतील स्थिती मात्र दयनीय झाली असून आज त्यांच्या स्वप्नांवर रजनीकांत यांनीही पाणी फेरले आहे. रजनीकांत यांनी आज अचानक जाहीर केलेला हा निर्णय सर्वांनाच अवाक करणारा ठरला आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयात केवळ प्रकृती हेच कारण असेल काय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अर्थात, त्या प्रश्नाचे उत्तर रजनीकांतच देऊ शकतील. रजनीकांत हे मुळात तामिळी नाहीत. त्यांना पूर्ण मराठी पार्श्वभूमी आहे आणि त्यांचे मूळ आडनाव गायकवाड असे आहे. मागे जेव्हा त्यांनी राजकारण प्रवेशाचे सूतोवाच केले होते, त्याचवेळी त्यांच्या विरोधातल्या राजकीय पक्षांनी त्यांचे हे मूळ काढून त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली होती. अर्थात, या एकमेव कारणामुळे रजनीकांत यांनी राजकारण प्रवेश टाळला असावा असे म्हणता येणार नाही, कारण ते मूळचे कोणीही असले तरी तामिळनाडूतील लोकांचे त्यांच्यावरील प्रेम जराही कमी झाले नसते.
लोक त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकतात. “रजनीकांत’ या नावाची तेथील लोकांवर नेमकी काय जादू आहे याचे लक्षावधी किस्से आजवर लोकांनी ऐकले आहेत, अनुभवले आहेत. एखादा अभिनेता लोकांच्या गळ्यातला ताईत असतो, म्हणजे नेमके काय असते हे रजनीकांत आणि तामिळी जनतेतील संबंधांवरून लक्षात येते. रजनीकांत यांनी आपल्या राजकारण प्रवेशाचा निर्णय कायम ठेवला असता तर तेथील सारेच प्रस्थापित राजकीय पक्ष गॅसवरच राहिले असते. आता त्यांच्या या निर्णयामुळे द्रमुक व अद्रमुक या पक्षाच्या नेत्यांनी निश्चितच सुस्कारा सोडला असावा. गेल्या काही दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण चित्रपट अभिनेत्यांच्या भोवतीच फिरत राहिलेले आहे. एमजीआर यांच्यापासून सुरू झालेला हा वारसा अजून कायम आहे. देशात अन्यत्र राजकीय पक्ष स्थापन करणे म्हणजे आपली राजकीय, आर्थिक, सामाजिक भूमिका आणि तात्विक मांडणी करणे आणि ती लोकांच्या गळी उतरवणे अशी प्रक्रिया असते. पण दक्षिण भारतात या विषयाला पूर्ण फाटा दिला जातो.
लोकांवर प्रभाव टाकणारा लोकप्रिय अभिनेता हेच तेथील लोकांचे सर्वस्व असते. हा जरा विचित्र प्रकार असला तरी तीच वस्तुस्थिती आहे. मग अशा अभिनेत्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयांची जाण किती हे विषय तेथे क्षुल्लक ठरतात. त्यामुळे रजनीकांत यांनी तामिळनाडूतील राजकारणात बऱ्यापैकी धुरळा निर्माण केला असता हे निश्चित. त्यांना पहिल्याच प्रयत्नात आणि केवळ पाच महिन्यांच्या अवधीत तामिळनाडूत सरकार स्थापन करण्याइतके यश मिळाले असते काय, याविषयी मात्र खात्रीने काही दावा करता आला नसता. कारण आंध्रात चिरंजीवी नावाच्या अभिनेत्याचा राजकारण प्रवेशाचा प्रयत्न मात्र तेथे फारसा यशस्वी ठरू शकला नव्हता. अखेर रजनीकांत यांच्या आजच्या घोषणेमुळे आता कोणत्याच शंकाकुशंकांना वाव राहिलेला नाही. आपण राजकारणात अध्यात्मिक राजकारणाचा नवीन पॅटर्न आणणार आहोत, अशी घोषणा रजनीकांत यांनी केली होती. म्हणजे ते नेमके काय करणार होते हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. अध्यात्मिक राजकारण हा शब्दप्रयोग त्यांनी वापरल्यामुळेच ते भाजपबरोबर जाणार अशी अटकळ बांधली गेली होती. पण आता सगळेच विषय बंद झाले आहेत.