कोल्हापूर: केंद्र शासन पुरस्कृत मनरेगामधील निधी येत्या मार्चअखेर खर्च करावा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंर्तगत सुरु असलेली कामे पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिले.
केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांची अमंलबजावणी, प्रगती व संनियंत्रण बाबतची आढावा सभा खासदार मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात झाली.
पुरग्रस्त भागातील लोकांना घरे मिळण्यासाठी 5 टक्के नैसर्गिक आपत्तीमधून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे अंतर्गत कागल सातारा रस्त्याचे सहापदरीकरण्याच्या कामांची निविदा करुन लवकरात लवकर काम सुरु करावे तसेच देवगड निपाणी रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा. पुरामुळे ज्या भागात रस्त्यावर पाणी साचून वाहतूक बंद होते अशा ठिकाणी रस्त्याची उंची वाढविण्यात यावी, अशा सूचना सबंधीत विभागास त्यांनी दिल्या.
गांधीनगर येथे पोस्ट ऑफिस आहे परंतु इमारत नाही याबाबत केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. विमान सेवाअंतर्गत नाईट लॅंडींगबाबत सुविधा सुरु करण्यासाठी विमान प्राधिकरणास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिग्रे-इचलकरंजी रेल्वे मार्गावरील पुलाचे कामाबाबतचे प्रस्ताव तसेच भुयारी रेल्वे मार्गाबाबतचे प्रस्ताव सादर करण्याबाबतच्या सूचना रेल्वे प्रशासनास देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.
बीएसएनएलची रेंज गगनबावडा, भुदरगड, राधानगरी इत्यादी दुर्गम भागामध्ये येत नाही, त्यामुळे आवश्यक तेथे टॉवर उभा करण्याबाबतच्या सूचना बीएसएनएल विभागास दिल्या आहेत. केंद्र शासन पुरस्कृत निधी उपलब्ध होणा-या सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला व केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ सर्व संबंधीत घटकांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने कार्यक्षम रित्या अमंबबजावणीसाठी प्रयत्न करावा मंडलिक म्हणाले.
यावेळी समितीचे सह अध्यक्ष तथा खासदार धैर्यशील माने, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला बाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण समिती सभापती स्वाती सासणे, शिक्षण व अर्थ सभापती प्रविण यादव, बांधकाम व आरोग्य सभापती हंबिरराव पाटील, प्रकल्प संचालक अजयकुमार माने उपस्थित होते.