माधव विद्वांस
जगाच्या रंगभूमीवर नाटकांच्या माध्यमातून 500 हून अधिक वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा आज स्मृतिदिन.
शेक्सपिअर यांचा जन्म वॉर्किशायरच्या एव्हॉन जिल्ह्यातील स्निटरफिल्ड येथे झाला. त्यांच्या जन्माची तारीख उपलब्ध नसली, तरी त्यांचा बाप्तिस्मा 26 एप्रिल 1564 रोजी झाला. शेक्सपिअरचे शिक्षण स्ट्रॅटफर्डमधील किंग्ज न्यू स्कूलमध्ये झाले होते. त्यांचे वडील शेती व विविध वस्तूंचा व्यापार करून श्रीमंत झाले होते. ते स्ट्रॅटफर्डच्या पंचायतीत अधिकारी होते. परंतु 1577 च्या सुमारास त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. त्यांची अधिकारपदे काढून घेण्यात आली. त्यामुळे स्ट्रॅटफर्डच्या मोफत शाळेत शिकणाऱ्या शेक्सपिअरचे शिक्षण थांबले व काहीतरी कामधंदा करणे त्यांना भाग पडले. वयाच्या 18 व्या वर्षी शेक्सपिअरने 26 वर्षीय ऍन हॅथवेशी लग्न केले. शेक्सपिअरने लेखन कधी सुरू केले याचा निश्चित उल्लेख सापडत नाही; परंतु समकालीन नोंदीवरून असे दिसून येते की, त्यांची अनेक नाटके 1592 पर्यंत लंडनच्या रंगमंचावर होती. नाटककार रॉबर्ट ग्रीनने त्याच सुमारास शेक्सपिअरवर केलेल्या टीकेवरून हे जाणवते. वर्ष 1592 साली ते सर्वांना नाट्यजगतातील नवोदित तारा म्हणून माहिती झाले. 1593 मध्ये शेक्सपिअर लॉर्ड चेंबरलिन्स मेन या राजाश्रय असलेल्या नाटकमंडळीत होते, अशी नोंद आहे. त्यामुळे आधीच्या सात वर्षांत त्यांनी नाट्यव्यवसायात विविध प्रकारची उमेदवारी केली असावी, असे मानले जाते.
प्राचीन रोमन कवी ऑव्हिडच्या मेटॅमॉर्फसिस या काव्यावर आधारित व्हीनस अँड अडोनिस, द रेप ऑफ ल्यूक्रीझ या दीर्घ कथनात्मक कविता व एकशे चौपन्न सॉनेट माला या शेक्सपिअर यांच्या काव्यसंपदा. शेक्सपिअर यांची सॉनेट माला (सॉनेट हा इटालियन काव्यप्रकार) इंग्रजी साहित्याचा बहुमोल अलंकार समजला जातो. प्लेगमुळे नाट्यगृहे 1592 ते 1594 दरम्यान बंद होती. या काळात शेक्सपिअर यांनी व्हीनस अँड अडोनिस व द रेप ऑफ ल्यूक्रीझ ही नितांत सुंदर काव्ये लिहिली. 1594 मध्ये नाट्यगृहे परत सुरू झाली. तेव्हापासून शेक्सपिअरचे नाव सतत पुढे येऊ लागले. ते काम करत असलेल्या लॉर्ड चेंबरलिन्स मेन या कंपनीने बेन जॉन्सन, डेकर आणि इतर नाटककारांचीही नाटके बसविली होती. या नाटक कंपनीसाठी शेक्सपिअर यांनी 1594 ते 1603 या काळात दर वर्षाला दोन याप्रमाणे नाटके लिहिली. या नाटकांचे प्रयोग लंडनमधील निरनिराळ्या नाट्यगृहांत सातत्याने होत होते. याच व्यवसायातून शेक्सपिअरचे आर्थिक वैभव उभे राहिले. ते किंग्ज मेनचे भागीदार झाले. त्यांनी स्ट्रॅटफर्डला घरे व शेती खरेदी केली. वडिलांना स्ट्रॅटफर्डचे बेलिफ म्हणून मिळालेले मानचिन्ह मिळवून दिले. ऐतिहासिक, सुखात्मक, शोकात्मक व सुख-दुःखांचे मिश्रण असणारे प्रणयप्रधान असे शेक्सपिअर यांच्या नाटकांचे चार प्रकार आहेत. ऐतिहासिक नाटकांत ब्रिटनमधील नागरिकांना राजघराणे व त्यातील व्यक्तींबद्दल
असलेले कुतूहल व प्रेम लक्षात घेऊन प्रामुख्याने इंग्लंडचा इतिहास उभा करून लॅंकेस्टर व यॉर्क घराण्यांची भांडणे व त्यांच्यातील यादवी युद्ध यांचे झालेले दुष्परिणाम दाखवून दिले. त्याबरोबर राष्ट्रीय ऐक्याचे महत्त्व व आदर्श राजाची प्रतिमा याचे कलात्मक दर्शन घडविले. त्यांच्या ऐतिहासिक नाटकांत इंग्लंडचे बहुतेक ट्यूडर राजे आलेले आहेत. त्यामध्ये चौथा, पाचवा, सहावा हेन्री, दुसरा, तिसरा रिचर्ड जॉन राजा ही त्यांची काही अमर व्यक्तिपात्रे आहेत. त्यातून शेक्सपिअरचे मानवी मनाचे सखोल व सूक्ष्म ज्ञान व निरीक्षण प्रत्ययास येते. या नाटकांमुळे युरोपीय देशात जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली. शेक्सपिअर यांच्या “रोमिओ ऍन्ड ज्युलिएट’, “ज्युलियस सीझर’, “हॅम्लेट’, “ऍथेल्लो’, “किंग लिअर’, “मॅकबेथ’ आणि “ऍन्टनी ऍन्ड क्लिओपात्रा’ या नाटकांतून शेक्सपिअर यांनी विश्वासघात,
कपटकारस्थाने, सूड, मत्सर, व्यभिचार, राक्षसी महत्त्वाकांक्षा याबरोबरच श्रेष्ठ मानवी मूल्ये, नियती, ईश्वरी न्याय व मृत्यूचिंतन याबाबतही यथार्थ दर्शन घडविले. एक मुलगा आणि मुलीच्या प्रेमकथेवर आणि त्यांच्या दुःखद मृत्यूवर आधारित आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात शेक्सपिअरने रोमिओ अँड ज्युलिएट हे नाटक लिहिले. वर्ष 1608 पर्यंत शेक्सपिअर यांचे वास्तव्य लंडनमध्येच होते. त्यांना राजदरबारी योग्य मानमरातब मिळाला. समकालीन नट जेम्स बर्बेज, बेन जॉन्सन, राजवर्तुळातील उमराव सौदॅम्टन यांच्याबरोबर व नाटककारांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या काळातच रंगभूमीवरील श्रेष्ठ नाटककार असा शेक्सपिअर यांचा वारंवार उल्लेख व गौरव होऊ लागला.
त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. काही लोकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा उद्योग सुरू केला; पण अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. आपल्या नाटकास मागणी असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वतः एक कंपनी स्थापून त्यांच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली. तसेच ग्लोब थिएटर नावाच्या नाट्यगृहाचे ते भागीदार झाले. आपल्याच नाटकांचे प्रयोग करू लागले. यामध्ये त्यांनी प्रचंड धन कमावले व स्ट्रॅटफर्डमधील अत्यंत श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.
शेक्सपिअर यांच्या नाटकांची अवघ्या जगातील नाट्यप्रेमींवर मोहिनी पडली. अनेक भाषेत त्यांची नाटके भाषांतरित झाली. भारताला रंगभूमीची प्राचीन काळापासूनच चांगली ओळख आहे. भारतातील रंगभूमीवरही त्यांचा प्रभाव पडला व ओघानेच मराठी नाट्यसृष्टीनेही शेक्सपिअरला आपला मानले. त्यांच्या नाटकावरून मराठीत “झुंझारराव’ सारखी नाटके गोविंद बल्लाळ देवल यांनी रंगभूमीवर आणली. रोमियो आणि ज्युलिएट या नाटकावरून संगीत तारा विलास (दत्तात्रेय अ. केसकर), प्रतापराव आणि मंजुळा (एकनाथ मुसळे), प्रेमाचा कळस किंवा रोमिओ ज्युलिएट (खंडेराव बेलसरे), मोहन तारा (के. रा. छापखाने), रोमिओ अँड ज्युलिएट (के. ज. पुरोहित), शशिकला आणि रत्नपाल (नारायण कानिटकर) ही नाटके मराठी रंगभूमीवर आली.
त्यांच्या नाटकांवर आधारित अनेक मराठी लेखकांनी नव्याने अगणित कथा-कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी मोहनाची अंगठी (द. गो. लिमये), संगीत प्रणयमुद्रा (विठ्ठल सीताराम गुर्जर), व्हेनिस नगरचा व्यापारी (खंडेराव बेलसरे), संगीत सौदागर (मोहन आगाशे), स्त्री न्यायचातुर्य (आत्माराम वि. पाटकर), मर्चंट ऑफ व्हेनिस (गोविंद वासुदेव कानिटकर) अशी अनेक नावे घेता येतील. 1610 च्या सुमारास शेक्सपिअर स्ट्रॅटफर्डला कायम वास्तव्यासाठी गेले. तेथेच 23 एप्रिल, 1616 रोजी या थोर नाटककाराचे निधन झाले. “नावात काय आहे?’ असे म्हणणारे शेक्सपिअर यांचं नाव मात्र अजरामर झाले आहे.