आज 15 मे “जागतिक कुटुंब दिन’. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कुटुंबातील संवाद मात्र या दिवशीही होत नाही. सध्याच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाशी जवळीकता साधण्याची एक सुसंधी उपलब्ध झाली आहे आणि दुरावलेला, तुटू पाहणारा कौटुंबिक सुसंवादाचा धागा पुन्हा एकदा प्रेमाच्या विणीने घट्ट होऊ पाहतो आहे. हे कौटुंबिक आणि सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.
जसा थेंबाथेंबाने समुद्र बनतो, कणाकणाने पर्वत बनतो तसेच प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या थोड्याशा शक्ती-युक्तीने संसाराचा गाडा सुरळीत तर चालतोच, पण संपूर्ण कुटुंबाचा उद्धारही होतो. कुठल्याही घरात कुटुंबाची प्रामुख्याने काळजी घेणारी, कुटुंब सुरळीत चालवणारी स्त्रीच असते. तिने प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, घरातील वडिलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे, इतरांच्या भावनांची कदर केली पाहिजे. जी स्त्री हे सर्व हसतमुखाने आणि कर्तव्य समजून करते, तिला सर्वांकडून तितकाच मान मिळाला पाहिजे आणि तो मिळतोच. घरातील सर्व कर्तव्य सांभाळून, आपल्या कलागुणांना वाव द्यावा, आपले छंद जोपासावेत, चार मित्र-मैत्रिणी मिळवाव्यात, धकाधकीचे जीवन जगत असताना, सुख-दुःखाच्या गप्पा मारण्यासाठी मैत्रिणीची अत्यंत गरज असते. हे सर्व सांभाळून आपले व्यक्तिमत्त्व व्यवस्थित ठेवावे, प्रसन्न राहावे म्हणजे संपूर्ण घरच प्रसन्न राहतं, हसर राहतं, तेव्हा आपलं घर, असं आपल्याला अभिमानाने म्हणता येईल. कारण घर म्हणजे फक्त विटा-सिमेंटचे बांधकाम नसतं, ते असतं आपलेपणाचे केंद्रस्थान. घर माणसांचं असतं. माणसांनी बनलेल्या कुटुंबाचं असतं.
खरं तर आपल्याला जन्मापासून स्वतःच घर असतं, किंबहुना एका कुटुंबातच आपण जन्माला येतो त्यामुळे कुटुंबाची वेगळी ओळख करून घ्यावी लागत नाही. कुटुंब ही एखादी संकल्पना नव्हे, तर ती समाजातील संरक्षक घडी आहे, शतकानुशतके ती अबाधित राहिली आहे. तरीही 15 मे हा जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा करण्याची गरज का निर्माण झाली असेल?
कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व ठसविण्यासाठी आणि ते टिकविण्यासाठी या विशिष्ट दिवसाचं आयोजन झालं असावं. मूरडॉक या मानववंशशास्त्रज्ञाच्या मते, आपापल्या स्वभाववैशिष्ट्यासह एका छताखाली राहणाऱ्या, आर्थिक सहकार्याची भावना असणाऱ्याचा समूह म्हणजे कुटुंब. हे सर्वमान्य कुटुंब चित्र आहे, आजपर्यंत आपण तसच पाहत आलो आहोत; पण त्याला आता थोडे थोडे कंगोरे पडत चालले आहेत, आजही एका छताखाली राहणारीच कुटुंबव्यवस्था या विश्वाच्या पटावर दिसत आहेत; परंतु प्रत्येक कुटुंबातली सर्व माणसं आंतरिक धाग्याने एकमेकांशी संलग्न असतात का? व्यक्तिस्वातंत्र्याच्या टोकदार कल्पनेमुळे कुटुंबात जितके घटक तितके कोन निर्माण झालेले दिसतात.
आपण सहजपणे त्रिकोणी कुटुंब, चौकोनी कुटुंब असं म्हणतो, त्यामध्ये आपल्याला तीन माणसे-चार माणसे असे अभिप्रेत असते, पण जितकी माणसं तितके कोन असलेलं नवे कुटुंबचित्र आपण पाहतोच आहोत, पुण्या-मुंबईत तर घरोघरी हे चित्र पाहायला मिळते, हे असे कोन का पडत असावेत? कारण कुटुंबातला प्रत्येक माणूस काळाच्या ओघात स्वायत्त घटक बनत चालला आहे, मुलं थोडी मोठी झाली की प्रत्येकाकडे घराची चावी असते, ती वस्तुतः सोयीसाठी दिली गेलेली असते, पण ती नकळतपणे स्वतंत्रतेचा एक भाग बनत गेलेली असते. अवलंबित्व संपत चालल्याची खूण त्यामधून उमटते. घरात प्रवेश केल्यावर जो तो आपापल्या रूममध्ये जातो. तिथे त्याच्या सेवेला कॉम्प्युटर, टीव्ही, होम थिएटर असतात. त्यामुळे तिथं त्याचं स्वतंत्र जग बनून जातं. प्रत्येकाजवळ मोबाइल असतो. त्यावरून अनेकांशी संवाद साधला जातो. घरात असणाऱ्या (किंवा नसणाऱ्या) टेलिफोन्सशी कुणालाच काही देणंघेणं नसतं, कारण त्यावाचून कुणाचं काही अडत नसतं. अनेक घरांमध्ये जेवणाची ताट घेऊन टीव्हीपुढे बसायची पद्धत आहे.
सारं लक्ष टीव्हीच्या फ्रेमकडे असल्याने कुटुंब असंवादी बनत चालली आहेत. फारतर टीव्हीवरील कार्यक्रमावर शेरेबाजी होते; परंतु कौटुंबिक विषयावर चर्चा किंवा संवाद होत नाही. ज्या संवादामध्ये अवघड विषय सोपे करण्याची ताकद आहे, अशा संवादास आपण मुकतो, म्हणजे आपणच आपले विषय जटील करत असतो. माणूस जेव्हा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी माणसं म्हणून माणसे जोडत जातो, त्यांच्याशी नाती गुंफत जातो, त्यावेळेस नकळतच त्याचं एक स्वतःचं असं कुटुंब निर्माण होते. कुटुंब आणि त्या कुटुंबाचे पूर्ण स्वास्थ्य परस्परामधील अतूट प्रेम, दृढ विश्वास, आपलेपणा आणि जिव्हाळा यांच्या भरभक्कम पायावरच अवलंबून असते.
एरव्ही ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने छोट्या मुलांना त्यांचा हरवलेला बाबा आणि आई, त्यांचे प्रेम, सहवास साथसोबत सध्या मिळत आहे. गावांत, प्रांतांत अडकून पडलेल्या लोकांच्या दृष्टीने मात्र हा काळही त्यांना मिळालेली एक भावनिक शिक्षा आहे. आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी आपण नोकरी, धंदा करतो, लहानमोठा व्यवसाय करतो, काबाडकष्ट करतो, मोलमजुरी करतो. कित्येकांना या गोष्टी करत असताना आपल्या कुटुंबापासून, गावापासून, आपल्या लोकांपासून हजारो किलोमीटर दूर जायला लागते. त्या दुराव्यातील जवळीकता अनुभवावी लागते. तरीसुद्धा माणूस हे सारं का सहन करतो? त्या परिस्थितीशी, वातावरणाशी, काळ, वेळ आणि प्रसंगाशी जुळवून का घेतो? तर आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी, त्यांच्या सुखासाठी.
सध्याच्या परिस्थितीतील स्वतःच्या घराकडे जमेल तसा किंवा प्रसंगी पायी प्रवास करत जाणारी माणसे, त्यांचे फोटो, बातम्या पहिल्या, वाचल्या की त्या सर्वांचे एकच उत्तर आपल्याला मिळते आणि ते म्हणजे, माणसाच्या मनातील कुटुंब प्रेमाची अनामिक ओढ! ही ओढच आपल्याला एकत्र येण्याची वीण ओवत असते.एकत्र कुटुंबासाठी आज त्याचीच गरज आहे.
– डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी