आणखी 54.89 कोटी रुपयांची वसुली बाकी
– संजय कडू
पुणे – शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 15.7 लाख वाहनचालकांना ई-चलन पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यातील फक्त 45 टक्के (7 लाख) वाहनचालकांनी स्वत: दंड भरला आहे. इतरांनी मात्र ती “तसदी’ घेतली नाही. या दंड चुकव्यांवर कारवाईसाठी नियमितपणे नाकाबंदी करण्यात येणार आहे. दंड चुकवणारी वाहने सापडल्यास त्यांना दंड भरल्याशिवाय सोडले जाणार नाही. यासंदर्भात पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दैनिक “प्रभात’ला माहिती दिली.
वाहतूक शाखेला ई-चलन दिलेल्या वाहनचालकांकडून आजवर 16.35 कोटी रुपयांचा दंड वसूल झाला आहे. तर, 54.89 कोटी रुपयांची वसुली बाकी आहे. लॉकडाऊनमुळे मार्च ते जूनदरम्यान वाहतूक शाखेची दंड वसुली प्रक्रिया ठप्प होती.
अनलॉकनंतर रस्त्यावर वाहनांची संख्या तसेच नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालकही वाढले. यामुळे पोलिसांनी दि.1 जानेवारी ते 15 ऑक्टोबरदरम्यान ई-चलन दिलेल्या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया दि.1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. यासाठी विशेष ट्रॅफिक नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. मोहीम सुरू केल्यावर काही दिवसांतच सरासरी 11 ते 12 लाख रुपये दंड वसूल केला जात आहे. पोलिसांनी दि.1 ते 6 नोव्हेंबरदरम्यान 60.40 लाख रुपयांची वसुली केली आहे.
…अशी असेल विशेष नाकाबंदी
– गर्दीच्या वेळेस कर्मचारी फक्त वाहतुकीचे नियमन करतील.
– दुपारी तीन ते पाच वाजेदरम्यान नाकाबंदी केली जाणार.
– सॉफ्टवेअरच्या मदतीने वाहनांची तपासणी करणार.
– नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एसएमएस केले जातील.
– संबंधितांनी वेबसाइटवर जाऊन त्यांच्या वाहनांचा दंड पाहावा.
– काही प्रकरणांमध्ये वाहनचालकांना नोटीस बजावणे सुरू आहे.
– नोटिसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या नागरिकांवर खटला भरण्यात येईल.
– वाहतूक दंडवसुली मोहिमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देण्यात येत आहे. हे रिवॉर्ड
प्रोत्साहन म्हणून दिले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्याने जास्तीत जास्त दंड वसूल करावा, असा त्यामागे उद्देश आहे.
– राहुल श्रीरामे, वाहतूक पोलीस उपायुक्त.